शनिवार, 14 अप्रैल 2018

नाणारचे ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नाणारवासियांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.
नाणारच्या प्रकल्पग्रस्तांनी आज (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की, ‘सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.’

केंद्र सरकारकडून नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील

रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सह्याही झाल्या. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे.

या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली होती.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे.

पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं.

नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

रविवार, 8 अप्रैल 2018

नाशिकमध्ये मनसेचे इंजिन धावले; भाजपला धक्का

नाशिक : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या क गटातील पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैशाली मनोज भोसले यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा २३३३ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेे मनसेला पाठिंबा दिला.

भाजपच्या विजया लोणारी यांना तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. वैशाली भोसले यांना ७४५३, शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांना ५२३१, तर भाजपच्या विजया लोणारी यांना ४८१० एवढी मते मिळाली. निवडणुकीत उभ्या असलेल्या उर्वरीत सहा जणांचे अनामत रक्कम जप्त झाली.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी येथे मनसेची जागा असली तरी बहुतांश भाग भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी व्यापला असल्याकारणाने येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होण्याची अपेक्षा होती. परंतु मतदारांनी पुन्हा भोसले कुटुंबीयांवर विश्वास ठेवत भाजपला नाकारले.