बुधवार, 21 मार्च 2018

रेल्वे, राज आणि बरेच काही..!

भारत हा तरूणांचा देश आहे. येथील 'डेमोग्राफीक डिव्हिडंड'बद्दल जगाला उत्सुकता आहे. युवकांच्या संख्येबद्दल कौतुकाने बोलले तर जाते. पण त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला, त्या सोडवायला कोणत्याही राजकीय पक्षाला वेळ नाही अशी स्थिती आहे. इंदिरा गांधी यांची हत्या न पाहिलेला वर्ग आज मतदार आहे. या मतदारानेच गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली. मोदींना या वर्गाची गरज पूर्णत: ज्ञात असल्याने त्यांनी या तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या रोजगारक्षम कार्यक्रमांवर भर देण्याची घोषणा केली होती.
उपजीवीकेचे साधन मिळवून देणाऱ्या प्रशिक्षणावर कौशल्य विकासावर त्यांनी भर दिला होता. हा कार्यक्रम अन्य घोषणांप्रमाणे यशस्वीपणे राबवला न गेल्याने देशातील युवक हताश झाले आहेत.
आगामी निवडणुकात या निराशांची फौज मोदींची जादू संपवू शकते. धर्मवाद, घोषणाबाजी अशा अनेक बाबींवर मोदी सरकारला धारेवर धरले जाते. पण या सरकारचे खरे अपयश रोजगारनिर्मितीत न मिळालेल्या यशाचे आहे. सतत भाषणबाजी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या बडया नेत्याला हे लक्षात आलेले दिसते आहे. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे नावाच्या तरूण नेत्याने जी वक्‍तव्ये केली त्यात तरूणांचा हा खरा प्रश्‍न कुठेही प्रतिबिंबित झाला नव्हता. राज ठाकरे वयाने तरूण आहेत, ते मोदीमुक्‍तीच्या घोषणा देत बोलत असताना, एकेकाळी त्यांना डोक्‍यावर घेऊन नाचणाऱ्या माध्यमांवर अकारण टीका करताना देशातील खरी समस्या कशी समजू शकले नाहीत असे राहून राहून वाटत होते.
मुंबईतील रेल्वे बंद पाडणाऱ्या अॅप्रेन्टीस युवकांना आधाराचा खांदा देत राज यांनी ही भाषणातील ही चूक दुरुस्त केलेली दिसते. रेल्वे, रेल्वेतील भरती हे राज यांच्या आवडीचे विषय आहेत. मुंबईत दररोज किती रेल्वेगाडया येतात याचे हिशेब तपासताना भारतात सर्वाधिक मोठा रोजगार देणारी भारतीय रेल्वे ही केवळ काही प्रांतातील तरूणांना संधी देत असल्याची माहिती राज यांना गवसली होती. लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान अशा नेत्यांनी रेल्वे आपल्या प्रदेशातील तरूणांना रोजगार देण्यासाठी वापरली हे एकेकाळचे राज यांचे आवडते वास्तव होते. भूमीपुत्र या रोजगाराला पारखे राहिले असे वास्तव ते बोलून दाखवत.
कल्याणला रेल्वेभरतीसाठी आलेल्या परप्रांतीयांवर हात साफ करून घेण्याचा प्रकार मनसेने केला होताच. त्याची मोठी आवृत्ती कमबॅक करण्यासाठी राज यांनी आता वापरलेली दिसते. ऐन परीक्षांच्या काळात मुंबई थांबवणे हे मतपेटीत वाढ करणारे ठरेल का माहीत नाही. पण तरूणांच्या समस्या हाती घेऊन अराजक निर्माण करण्याचा मार्ग राज यांनी पुन्हा एकदा अंगीकारलेला दिसतो. आधी मोदींची स्तुती नंतर मोदींपासून मुक्‍ती ,निवडणूक लढण्याची घोषणा मग नंतर घूमजाव अशा कोलांटयाउडया मारणारे राज ठाकरे विश्‍वासार्हता गमावून बसले आहेत. ती मिळवायला त्यांना प्रचंड मेहनत करावी लागेल. आमदारसंख्या भूतकाळ आहे, संघटना मागील काळात नव्हती, वर्तमानात दिसत नाही आणि भविष्यात उभी रहाण्याची स्थिती नाही. अशा परिस्थितीत आंदोलने हा मार्ग चोखाळणे तसे सोपे असते. खळळखटयाक झाले की दंगा केल्याचे समाधान मिळते. विधायक कामाची दिल्ली दूर असल्याने बेदिली माजवणे सोपे जाते.
वाहतूक ही मुंबईची मोठी समस्या आहे. ओला, उबेर या खाजगी गाड्‌यांच्या बंदला समर्थन देत मनसेने काहीतरी केले आहे अन् दुसऱ्याच दिवशी यातायात बंद करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला आहे. यामुळे राज खोऱ्याने मते खेचतील, असे नाही. पण सरकारसंबंधात झालेल्या भ्रमनिरासाला नेतृत्व देऊ बघतील. अमराठी मंडळींविरोधातील मनसेच्या आंदोलानामुळे महाराष्ट्रातील छोटे-मोठे उद्योग एकेकाळी ठप्प पडले होते. सेनेने प्रारंभीच्या काळात अंगीकारलेली भूमीपुत्रांच्या रोजगारी समस्या हाती घेण्याची पद्धत मनसेने पुन्हा एकदा अंगीकारली आहे. यात कुणाचेही भले नाही. हे तर खरेच पण सरकारला विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना या तरूणांच्या असंतोषाला संघटित रुप येण्यापासून थांबवावे लागणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत, तरूण आहेत. बेरोजगारांच्या फौजांचे काय करायचे हा प्रश्‍न त्यांना भेडसावतो काय? त्यांचे गुरू नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यावरचे उत्तर आहे काय ?
राज यांना समस्येला उत्तर शोधायचे नाहीये, ते काम फडणवीसांचे आहे, मोदींचे आहे आणि भारत जिंकू बघणाऱ्या अमितभाई शहांचेही आहे.
राज ठाकरे यांच्यात सातत्यपूर्णतेचा लवलेश नाही. पण अशी आंदोलने हवा तयार करतात. ती सुरू करणाऱ्यांचे या खेळात काही जात नसते. राज्यकर्त्यांना मात्र त्यातून मार्ग काढून समाजाला शांत करावे लागते. राज यांना वणवा पेटवायचा आहे, तेवढे झाले तरी त्यांना बाकी काही करण्याची गरज भासणार नाही. खरे तर राज यांनी विधायक कामांकडे जास्त लक्ष द्यावे. महाराष्ट्राच्या विकासासाठी तयार केलेल्या ब्लूप्रिंटपेक्षा रेल्वे अडवणे सोपे आहे, वांझोटेही. राज यांचा भर आक्रमक मनसुब्यांवर दिसतो. त्याकडे सरकारला लक्षपूर्वक पहावे लागेल. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. ते थांबून जाणे परवडणारे नाही. राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या मनसे मेळाव्याबद्दलच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या. मोदीमुक्‍त भारताचा संदेश दिल्याने मोदीविरोधकांना ते भाषण कमालीचे आवडले होते. मोदीभक्‍तांनी एका आमदाराच्या जोरावर दिलेली मुक्‍तीची हाक साहजिकच कडव्या टीकेचा विषय ठरवली. जनमनात स्वत:बद्दल प्रचंड उत्सुकता तेवती ठेवणारा हा नेता अधूनमधून बोलतो. आझाद मैदानावरचे पोलिसांच्या समर्थनार्थ केलेले भाषण असेल किंवा परळच्या रेल्वे दुर्घटनेनंतर चर्चगेट स्थानकाबाहेर घेतलेली छोटेखानी सभा असेल राज लक्ष वेधतात.
जनता भलेही त्यांना मते देत नसेल. पण त्यांचे भाषण मात्र ऐकते. त्यामुळेच ते दुर्लक्षून चालणार नाही. परवाच्या नववर्षसभेतील भाषणात बरेच विरोधाभास होते. काही वर्षांपूर्वी राज अचानक गुजरातेत थडकले होते अन् तेथील प्रगतीचा स्तिमीत करणारा आलेख त्यांनी स्वत:हून जनतेसमोर मांडला होता. (मोदींच्या निमंत्रणावरुन ते तेथे गेल्याचे ऐकिवात तरी नाही) मोदींवर आरत्या ओवाळणारा हा पहिलाच अन्यपक्षीय नेता असावा. आता भूमिका बदलल्या आहेत. माणूस प्रगल्भ होत असतो असे म्हणतात. त्यामुळेच की काय पण आता त्यांना मोदींपासून भारताने स्वत:ची सुटका करून घेणे गरजेचे वाटते. पुन्हा पुढच्या सहा वर्षांनी नेमके काय वाटेल ते माहीत नाही, पण असा प्रश्‍न ठाकरे घराण्यातील कुणालाही विचारायची तौहीन करायची नसते. (मोदी शहा मराठी वाचत नसल्याने त्यांच्याबददल टीकात्मक लिहिणे सोपे असते ,सांप्रतकाळी फॅशनेबलही) नितीन गडकरी हे रोडकरी या गौरवास पात्र असल्याचेही ते काही काळापूर्वी म्हणाले होते.
राज यांच्या कित्येक भाषणातला प्रत्येक शब्द माध्यमे घराघरात पोहोचवतात. पण ही प्रसिध्दीमाध्यमे मोदींची आणि विशेषत्वाने अमित शहांची बटिक असल्याची माहिती त्यांनी जनतेला दिली आहे. माझ्या भाषणाच्यावेळी वीजपुरवठा बंद केला गेला नाही, तरच ते तुम्हाला ऐकायला मिळेल असे ते म्हणाले. अशी वीज कुठे गेल्याची बातमी नाही, ती शहा यांच्या दमनकारी नीतीने दडवली गेली का माहीत नाही पण शहा यांनी माध्यमांच्या मालकांना दूरध्वनी करुन ते भाषण नक्‍कीच बंद पाडले नाही. कारण भाषण दिसत होते. (शहा यांना राज दखल घेण्यायोग्य वाटत नाहीत की काय ? गुजराती दुकानदारांनी काही संपर्क असेल तर सांगावे, असो) हे भाषण करताना राज यांनी केलेली काही वक्‍तव्ये त्यांच्याबद्दल ममत्व असणाऱ्यांना नाराज करणारी होती. मोदी उदयापूर्वीच्या काळात संघविचारांबद्दल आस्था असणारा मतदार राज यांच्याकडे आशेने बघत होता. त्यावेळी भाजपकडे नायक नसल्याने या मतांचा लंबक राज यांच्यावर काहीकाळ स्थिरावला होता. कल्याण-डोंबिवलीच्या महापालिका निवडणुकीत काही वर्षांपूर्वी मनसेला मिळालेली मते या मंडळींची होती. आज परिवारावर निष्ठा असलेली मंडळी मोदींवर काहीशी नाराज आहेत. घोषणा प्रत्यक्षात येत नाहीत ही त्यांची खंत आहे. ही नाराज मंडळी राज यांना पसंती देतील का हा प्रश्‍न असला तरी भविष्यात तसे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
सरसंघचालक मोहन भागवत यांना भाषणात ओढून या वर्गाला राज यांनी अकारण नाराज केले. सरसंघचालकांचा जाहीर उल्लेखही या मंडळींना आवडत नाही, राज तर टीका करून मोकळे झाले. संरक्षणक्षेत्रात लुडबूड करणाऱ्या उदयोगाबद्दल राज बोलले तरीही भाषण कोणत्या वर्गासाठी होते हे कळत नव्हते. ऍप्रेन्टीसांना पाठिंबा देऊन राज यांनी नाराज युवकांना चुचकारल्यासारखे दिसते तरी आहे. हे आंदोलन किती काळ टिकेल माहीत नाही. शिवाय त्यामुळे काही प्रश्‍नही निर्माण होणार आहेत. संघराज्य प्रणालीत स्थानिकांना नोकरीत वाटा असावा का येथपासून चेल्याचपाटयांना नोकरी देणार्रंया लेकुरवाळ्या रेल्वेवर अजून किती भार टाकणे शक्‍य आहे. येथपर्यंतचे अनेक प्रश्‍न समोर येतात. राज यांना खरेच त्याबद्दल काही विचार मांडायचे आहेत काय? मुंबई बदलली आहे, जगही बदलले आहे. या चकचकीत आधुनिक जगाने युवकांना रोजगार दिले नाहीत हे खरेच आहे. पण त्यावर उत्तर खळळखटयाक करणे आहे की ब्लूप्रिंट ? राज यांनीच उत्तर शोधलेले बरे. जनतेला कृती हवी असते.
शेतकरी मोर्च्यात मला सत्ता द्या, असे विधान करणारे राज ठाकरे कोणाच्या ताकदीवर अशी स्वप्ने पाहतात ते माहीत नाही. उत्तर शोधण्याची त्यांची मानसिकता असेल तर ते त्यांच्या आगामी वाटचालीसाठी बरे ठरेल. किसान सभेच्या लाँग मार्चच्या आयत्या मंचावर गेलेल्या कॉंग्रेसने आजही चोखपणे पत्रक काढले आहे. देशात दररोज 33 हजार युवक नोकरी मिळवण्याच्या स्पर्धेत शिरतात अन् रोजगार तयार होतात. केवळ 450. शिवाय 551 नोकऱ्या दररोज रद्दबातल होतात, असे भयावह वास्तव प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समोर आणले आहे. राजवट कुणाचीही असो, हे भयावह आहे. अपेक्षांचे ओझे उंचावणारे मोदी यावर उत्तर शोधू शकले असते. तर फार बरे झाले असते. - मृणालिनी नानिवडेकर

सोमवार, 19 मार्च 2018

राजसाहब, बदल रहे है !

काँग्रेस मुक्त भारतची बेंबीच्या देटापासून भाजपनेही आरोळी ठोकली. तरीही भारत काँग्रेस मुक्त होऊ शकला नाही. काँग्रेसची परिस्थिीती नाजूक आहे हे खरे आहे. पण, तो भारत मुक्त होऊ शकणार नाही. तेच मोदीबाबतही म्हणता येईल. आज देशात सर्वाधिक राज्यात भाजप सत्तेवर आहे. राहुल गांधी किंवा राज ठाकरे म्हणतात म्हणून भारत मोदी मुक्त होईल का ? 
अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकारण बदलत आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर पुढे मिळेलच. आज ते सर्व घटकांना बरोबर घेऊनच जाण्याचा विचार करीत आहेत असे त्यांच्या भाषणावरून दिसून येत आहे. राज यांचे काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठीकडून हिंदुत्त्वाकडे वळले होते. त्यांचे हिंदुत्वही ज्वलंत होते. ते भाजपच्याही कधी कधी पचनी पडत नसे. राज हे शिवसेनेत असताना हे दोन्ही मुद्दे घेऊन लोकांपुढे गेलेले आहेत. त्यांनीही एैन उमेदीच्या काळात जोरदार बॅटींग करून शिवसेनेच्या पदरात कसे यश पडेल यासाठी कष्ट घेतले होते. राज यांना हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हित महत्त्वाचे वाटते. मराठी माणूस हा त्यांच्या राजकारणाचा कणा आहे. असे असले तरी केवळ उच्चवर्णिय मंडळींना राज खूप जवळचे वाटतात. आता ही प्रतिमा पुसण्यासाठी जे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
हा तेल्या तांबोळ्यांचा पक्ष बनला पाहिजे असे जर त्यांना वाटत असेल आणखी खूप कष्ट त्यांना घ्यावे लागतील. बीसी, ओबीसी, आदिवासी, माळीसाळी, तेलीतांबोळी, मुस्लीम, ख्रिश्‍चन, जैन, लिंगायत, धनगर आदी ज्या अठरापगड जातीपाती आहेत त्यांच्यापर्यंत पक्ष पोचला पाहिजे. शिवसेना घराघरात का पोचली हे ही त्याला एक कारण आहे. महाराष्ट्रात तरी शिवसेना आणि मनसे हे दोनच पक्ष असे आहेत की जेथे जातीला स्थान नाही. स्वत: ठाकरे हे "सीकेपी' आहेत म्हणून हे दोन्ही पक्ष "सीकेपीं'चे आहेत असे कोणी म्हणत नाहीत. इतर पक्षाचे तसे नाही.

भाजप हा भटाबामनांचा, काँग्रेस, राष्ट्रवादी मराठा, अल्पसंख्यांकाचा, आरपीआय दलितांचा असे आजही कमीअधिक प्रमाणात समजले जाते. मनसे तर पिऊर मराठी माणसाचा पक्ष म्हणून समजला जातो. मात्र राज्यात ज्या म्हणून काही मराठी जाती आहेत त्यामध्ये मनसेच अद्याप पोचला नाही. गावखेड्यात हा पक्ष पोचण्यासाठी मनसेला खूप मोठे जाळे विणावे लागेल.
2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता राज्यात काही नवीन समीकरणे उदयास येतील असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. दोन्ही कॉंग्रेस, शिवसेना, मनसेचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी दीर्घकाळ सत्तेवर राहिले तर आपले काही खरे नाही ही भीती महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रादेशिक पक्षांना सतावत आहे. त्यामुळे ममता, चंद्राबाबू, उद्धव असोत राज ठाकरे ही मंडळी मोदींवर तुटून पडत आहेत.
मोदी हे भाजपला विजयश्री मिळवून देणारे एकमेव नेते आहेत. मोदी या दोन नावावर भाजपचा पताका पुढेही फडकेल असा विश्वास या पक्षातील नेत्यांनाच नव्हे तर ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे. मोदीविरोधात सर्व विरोधक कितीही गरळ ओकत असले तरी त्यांच्यावर अद्यापही देशातील जनतेचा विश्वास आहे. आज कॉंग्रेस त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत असली तरी याच काँग्रेसवाल्यांनी आपला चेहरा पुन्हा एकदा आरशात पाहयला हवा.
काँग्रेस भ्रष्ट आहे हा जो डाग या पक्षाला लागला आहे तो लवकर पुसला जाणार नाही. कॉंग्रेस भ्रष्टाचाररूपी रावण जोपर्यंत गाडण्याची प्रतिज्ञा करीत नाही तोपर्यंत अवघड आहे. कोणत्याही राज्यात स्वच्छ प्रतिमेबरोबर विजय मिळवून देणारे खमके आणि तरूण नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. तसेही चित्र अद्याप कॉंग्रेसमध्ये दिसत नाही. ते केवळ मोदींनाच लक्ष्य करीत आहेत.
इमेज जितकी डॅमेज करता येईल तितके करण्याचा प्रयत्व प्रादेशिक पक्षही करीत आहेत. राज हे ही तेच करीत आहे. ऐरवी ते नेहमीच कॉंग्रेस, शिवसेना, भाजपवर टीका करीत असतात. कालमात्र तसे चित्र दिसले नाही. त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य केवळ भाजपच ठेवले होते. भाजप सरकार कसे वाईट आहे हेच ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जर्मनीत हिटलार वापरत असलेल्या क्‍लृप्ल्त्या केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वापरत असल्याचेही ते म्हणाले. हा त्यांचा कट लक्षात घेतला नाही तर भविष्य खूप अवघड आहे. देशात आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती आणणारे हे सरकार पुन्हा येणार नाही याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. मोदींच्या झंझावातामुळे प्रादेशिक पक्षांचा पालापाचोळा होत आहे, की काय अशी भीती व्यक्त केली जात असताना यूपीतील पराभवाने विरोधकांना विशेषत: प्रादेशिक पक्षांना नवी उभारी मिळाली. त्यांच्या पंखात बळ आले आहे. भाजप विरोधात महाराष्ट्रात तरी विरोधकांनी मोट बांधली आणि शिवसेनाही सत्तेतून बाहेर पडली तर भाजपला सर्व विरोधकांशी सामना करताना दमछाक होणार आहे. मोदींची प्रतिमा जितकी म्हणून मलिन करता येईल तितकी केल्यास त्याचा राज्यात फायदा उठविता येईल हेच गणित सर्वच पक्ष मांडत असावेत. मात्र मोदी-फडणवीस हे ही कच्च्या गुरूचे खेळाडू नाहीत तेही विरोधकांशी तितक्‍यात ताकदीने उतरणार नाहीत का ? तसे अमित शहांनीही बोलून दाखविले आहेच.

तरीही महाराष्ट्रात भाजप सरकारला सत्तेवरून कसे खाली खेचता येईल याचाच विचार आतापासून सुरू आहे असे म्हणावे लागेल. ज्येष्ठ नेते शरद पवारांची मुलाखत घेणे, कालच्या जाहीरसभेच्या एकदिवस आधी त्यांची पुन्हा भेट घेणे, हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले जाईल. हे षडयंत्र ओळखा असे आवाहन ते दोन्ही धर्मियांना करतात. मनसे हा कोणत्याही धर्माचा पक्ष नाही. सर्व जातीधर्माना बरोबर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतील असे दिसते. या सर्व घडामोडी लक्षात घेता राजसाहब, बदल रहे है ? असे कोणीही म्हणू शकतो.
हे सर्व असले तरी ज्या भाजपने काँग्रेस मुक्त करण्याची हाक देशवाशियांना दिली. तरीही भारत काँग्रेस मुक्त होऊ शकला नाही. तेच पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबतही म्हणता येईल. आज देशात सर्वाधिक राज्यात भाजप सत्तेवर आहे. राहुल गांधी किंवा राज ठाकरे म्हणतात म्हणून भारत मोदी मुक्त होईल का ?
-प्रकाश पाटील