गुरुवार, 30 नवंबर 2017

राज यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं फक्त एक मत गेलं : नाना पाटेकर

णे : “प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.
आज पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह विविध विषयांवर मत मांडलं.

मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आवळला होता. “भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता,” असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता.
नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. “नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

“महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला,” असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली.
या विषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, “राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. पण राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं.”

मंगलवार, 28 नवंबर 2017

मार खाणारे नाही तर मार देणारे कार्यकर्ते अपेक्षित - राज ठाकरे

मुंबई - आंदोलनात मला मार खाणारे नाहीत, तर मार देणारे मनसैनिक हवे आहेत, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली असल्याची माहिती मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुंबईतील फेरीवाले आणि त्यांना समर्थन देणारे मुंबई कॉंग्रेसचे विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
विक्रोळीत दुकानदारांत मराठी पाट्यांच्या मुद्द्यासाठी गेलेल्या मनसैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी कृष्णकुंज येथील निवासस्थानी मनसे पदाधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असल्याचेही बोलले जात आहे. या सगळ्या घटनांबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात येणार आहे.
मनसैनिक विरोधी गटाकडून मार खातातच कसे? असा सवाल करत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. मारहाणीत आपल्या कार्यकर्त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, हे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे, असेही ठाकरे म्हणाल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
आमचे कार्यकर्ते दुकानदारांना नुसते निवेदन द्यायला गेले होते. त्यांच्यावर अचानक हल्ला होतो, तसेच हा हल्ला पूर्वनियोजित असून, ही गंभीर बाब आहे. यात प्रशासनाचे लक्ष नाही. किंबहुना प्रशासन हे जाणूनबुजून करत असल्याचा आरोपही शालिनी ठाकरे यांनी केला आहे.