शनिवार, 14 अक्तूबर 2017

रस्त्यावर फिरू देऊ नकाः राज ठाकरे

मुंबई: शिवसेना-मनसे मध्ये पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांना रस्त्यावर सहज फिरुन देऊ नका, असे आदेशच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते. या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
मनसेच्या फुटलेल्या सहा नगरसेकांच्या प्रभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर धाव घेतली. राज ठाकरे यांनी स्वत: या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन या फुटीबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. त्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण, त्यांची अवस्था शिवसेनेत वाईट होणार. घर का ना घाट का अशी अवस्था होईल. तुम्ही कामाला लागा, असे सांगत त्या पैकी एकालाही रस्त्यावर सहज फिरु देऊ नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.
मनसे स्थापन झाल्यावर दादर मध्येच शिवसेना आणि मनसे मध्ये पहिली दंगल झाली होती. त्यात अनेक जण जखमीही झाले होते. त्यानंतर लहान मोठे वाद होत होते. मात्र, या नगरसेवक फुटीनंतर हा संघर्ष रस्त्यावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगरसेवकांना पोलिस संरक्षण
या फाटाफुटीमुळे होणाऱ्या संघर्षाचा धोका ओळखून सहाही नगरसेवकांना आणि त्यांच्या कुटूबियांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे समजते. तर, दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावरुन जोरदार हल्ला चढवण्यास सुरवात केली आहे. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहाही नगरसेवकांना फेसबुक मधून अनफ्रेंड केले आहे.
शिवसेनेच्या आमदार नगरसेवकांनाही नव्हती माहिती
नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या अनेक जेष्ट नगरसेवकांसह आमदारांनाही नव्हती.शुक्रवारी दुपारी फुटीची चर्चा सुरु झाल्यावर शिवसेनेचे नगरसेवक आमदार मनसेच्या नेत्यांकडूनच माहिती कन्फर्म करत होते.
दुपार पर्यंत संपर्कात
वरळी येथील बंडखोर नगरसेवक दत्ताराम नरवणकर यांनी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास त्यांच्या शाखाअध्यक्षाला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला, ही माहिती काही मिनीटात कृष्णकुंजवर पोहचली. राज ठाकरे स्वत: बंडखोर दिलीप लांडे यांच्या संपर्कात होते. तसेच इतर नगरसेवकांनाही संपर्क साधला जात होता. डॉ.अर्चना भालेराव यांच्या पतीशी संपर्क साधला असता त्यांनी शिडीला जात असल्याचे सांगितले. परमेश्‍वर कदम यांनी बारामतीला असल्याचे सांगीतले. राज ठाकरे स्वत: लांडे यांच्याशी बोलत होते.10 मिनीटात पोहचतो. ट्राफिक मध्ये अडकलोय असा बहाना लांडे करत होते. अखेरीस त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरवणकर यांच्यासह वरळी येथे एका जुन्या गाडीतून जाताना पाहिले. त्यानंतर सर्वांचाच संपर्क तुटला.

Youtube channel ला subscribe करा https://www.youtube.com/channel/UC9ZbmEr8JZWsUDMczLNTzGg

मंगलवार, 10 अक्तूबर 2017

परप्रांतीय कामगारांना 'मनसे'ने दिला चोप

कुपवाड - स्थानिक युवकांना औद्योगिक वसाहतीत काम मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत परप्रांतीय कामगार हटाओ मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश न आल्याने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुपवाड औद्योगिक वसाहतीत मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना अडवून बेदम चोप दिला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकारानंतर मनसेचे कुपवाड शहर प्रमुख विनय देवगोंडा पाटील (वय २०, लिंगायत गल्ली) याच्यासह सागर लक्ष्मण मगदूम (वय २२) आणि अविनाश तुकाराम मासाळ (वय २३, दोघे बजरंगनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जितेंद्रकुमार रामेश्‍वर साह (वय २५, एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी - औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी स्थानिक युवकांनाच प्राधान्य दिले पाहिजे. मात्र औद्योगिक वसाहतीत परप्रांतीयांना अधिक नोकऱ्या दिल्याने स्थानिक युवक बेरोजगार आहेत. यासाठी परप्रांतीय हटाओ मोहीम मनसेने सुरू केली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कुपवाड परिसरात आज आंदोलन करण्यात आले.
दरम्यान,  मंगळवारी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सुटी असल्याने परप्रांतीय कामगार मिळाले नाहीत. मुख्य रस्त्यावरून चालत जाणाऱ्या परप्रांतीय युवकांना मारहाण करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली. घाबरलेल्या परप्रांतीय कामगारांनी पळ काढला. त्यानंतर तातडीने कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी शहराध्यक्ष पाटीलसह तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
‘‘औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देण्याचा अध्यादेश २००८ मध्ये पारित करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरवा केला. मात्र दखल न घेतल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यामुळे  इथून पुढेही परप्रांतीय हटाओ मोहीम सुरूच राहील.’’
- तानाजी सावंत, 

जिल्हाध्यक्ष, मनसे, सांगली
सोशल साईटवर बातमी व्हायरल
‘मनसे’ स्टाइल आंदोलनाचे वृत्त समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. सायंकाळी झालेल्या प्रकारानंतर हा प्रकार वाऱ्यासारखा सोशल साईटवर फिरला. मारहाण सुरू असताना कोणीतरी व्हिडीओ तयार करीत होते. ती व्हिडिओ क्‍लिपही व्हायरल झाली. या प्रकारामुळे औद्योगिक वसाहतीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. तीही व्हायरल झाली.
संतप्त प्रतिक्रिया
‘मनसे’ या पक्षाचा परप्रांतीयांना रोखणे, हा पक्षीय अजेंडा असू शकतो; मात्र भरचौकात युवकांना अडवून बेदम मारहाण करीत त्यांच्या गृहोपयोगी वस्तूंचीही नासधूस करण्यात आली. हे अमानवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.