शुक्रवार, 2 जून 2017

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास मॅरेथॉन बैठक


मुंबई:  राज्यातील शेतकऱ्यांनी अखेर दोन दिवसांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री चार तास झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा या बैठकीनंतर कऱण्यात आला.
अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,   शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि  शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली असून, ही समिती 31 ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहेत.
तसंच दुधाचे भाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. किंमतीबाबत 20 जूनपर्यंत  निर्णय होईल.
आंदोलनात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्या शेतकऱ्याच्या परिवाराला सरकार आर्थिक मदत करणार.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकरी संप आणि शेतकरी मागण्यांवर सुमारे चार तास चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे. अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीवर कार्यवाही केली जाईल.या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येईल “.
याशिवाय शेतकऱ्यांना  हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. त्यासाठी पावसाळी अधिवेशनात कायदा करण्यात येईल. शेतमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी राज्य कृषिमूल्य आयोग स्थापन करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
  • हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात त्याबाबत कायदा करण्यात येणार आहे.
  • राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.
  • दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्यासंदर्भात विचार
  • वाढीव वीज बिलाचा पुनर्विचार
  • थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय
  • शीतगृह साखळी निर्माण करणार
  • नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार
  • शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गुंडावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही

गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये : राज ठाकरे

गिरणी कामगारांचं झालं, ते शेतकऱ्यांचं होऊ नये : राज ठाकरे
मुंबई : शेतकऱ्यांचा राग समजू शकतो. जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये. त्या संपातही मालकांना त्रास झाला नाही, कामगारांना झाला, तसं शेतकऱ्यांसोबत होऊ नये, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संपाविषयी मनसेची भूमिका मांडली. शेतकरी संपाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारकडे पैसे नाहीत, आता म्हणतात कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
”शेतकरी आंदोलनाचा आणि पक्षाचा काय संबंध?”
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाशी जोडून मोकळं होऊ नका, ते मांडतात तो विषय योग्य की अयोग्य एवढं फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. शेतकरी संपात काही पक्षांचा सहभाग असून ते हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
शेतकरी संपात पक्षाचा सहभाग असला तरी त्यांचा प्रश्न योग्य की अयोग्य ते ठरवून त्यावर निर्णय घ्या. आपल्याकडे फक्त प्रश्न तयार होतात. त्याचं उत्तर मिळत नाही. मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले, त्याचं पुढे काय झालं? असंही राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेवर हल्लाबोल
शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रश्नाविषयी राग किंवा चिड दिसत नाही. ते सध्या कुठे आहेत, तेच दिसत नाही. त्यांना जे काही खाती दिलेली आहेत. त्यातच ते व्यस्त आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेचाही समाचार घेतला.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
  • जवान आणि किसान दोघेही मरतायेत, भाजपवाले मात्र खुशाल – राज ठाकरे
  • योजनांना गोंडस नावं देऊन सरकार भुलवतंय – राज ठाकरे
  • निवडणुकीआधी घोषणा, सत्तेत आल्यानंतर घोषणा, पैसे आहेत का यांच्याकडे? – राज ठाकरे
  • अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर करावं, पण प्रश्न सोडवावा, ते महत्त्वाचं आहे – राज ठाकरे
  • शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा, शेतकऱ्यांसोबत कायमच आहे – राज ठाकरे
  • मराठा आरक्षणासाठीही मोर्चे निघाले, पुढे काय झालं?, आपल्याकडे तोडगे निघत नाहीत – राज ठाकरे
  • शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पक्षाचं लेबल का लावताय? – राज ठाकरे
  • सरकारकडून शेतकरी आणि जनतेची फसवणूक – राज ठाकरे
  • हे सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे – राज ठाकरे
  • सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का? – राज ठाकरे
  • शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो, मात्र जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये – राज ठाकरे