शनिवार, 25 फ़रवरी 2017

राज ठाकरे यांचे तुर्तास मौन

मुंबई - मुंबई महापालिकेतील मनसेचे कलिना येथील प्रभाग क्रमाकं 166 चे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलायचे टाळले. राजाला साथ द्या, असे आवाहन जनतेला करुनही मनसेला नाशिकसह राज्यातील महापालिका निवडणुकीत दारुण पराभव सहन करावा लागला. निकालानंतर राज यांनी माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले.
भाजपाच्या पराभुत उमेदवारांकडून मारहाण झालेल्या जखमी मनसे उमेदवारांना भेटल्यानंतर राज ठाकरे हे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. परंतु. त्यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. तुर्तास तरी राज ठाकरे यांनी मौन घेतलेले दिसते. भाजपाचे उमेदवार सुधीर खातू यांच्या समर्थकांनी 23 फेब्रुवारीच्या रात्री तुरडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मनसेचे 10 ते 12 पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुरडे यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तुरडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईभर उमटले होते. या हल्ल्यानंतर भाजपाबाबतही मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. राज ठाकरे यांनी संजय तुरडे आणि कुटुंबियांची भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई हे त्यांच्यासोबत होते. तरडे यांच्या आपण पाठिशी असल्याचे बाळा नांदगांवकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नाशिक, पुणे, मुंबईसह महापालिकेत मनसेच्या पदरी अपयश पडल्यानंतर राज हे कृष्णकुंज बाहेर पडल्यामुळे ते आपली प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु नाशिक महापालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेला केवळ पाच जागांवर यश मिळाले तर मुंबई 7, उल्हासनगर 2 आणि पुणे 1 असे 15 मनसेचे नगरसेवक निवडून आले आहेत. नाशिक महापालिकेत केलेल्या कामाच्या बळावर मनसेने अन्य महापालिकेत पक्षाला मतदान करावे असे आवाहन केले होते. परंतु, मनसेला मतदारांनी नाकारले. मुंबई महापालिकेत मनसेला 7 जागा मिळाल्या आहेत. 227 जागा असलेल्या महापालिकेत शिवसेना किंवा भाजपाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत मनसे कोणाला साथ देणार याकडे लक्ष लागलेले आहे.