रविवार, 7 फ़रवरी 2016

तेच आता गांधी कुटुंबावर घसरले- राज ठाकरे

पुणे - भाजपचे लोक पूर्वी कॉंग्रेस पक्षाला संसदेत काम करू देत नव्हते. कॉंग्रेस काम करू देत नाही म्हणून तेच आता गांधी कुटुंबावर घसरले असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कसबा विभाग मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी मनसेचे कसबा विभाग प्रमुख आशिष देवधर यांनी ठाकरे यांचा सत्कार केला. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन असल्याने शाळांमध्ये जाऊन चारऐवजी दहा मान्यवरांना पाठवून मराठीचे महत्त्व पटवून सांगण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्याचे देवधर यांनी सांगितले. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, अनिल शिदोरे, दीपक पायगुडे, अविनाश अभ्यंकर, रणजित शिरोळे यांसह मनसेचे नगरसेवक उपस्थित होते. 

हेल्मेट सक्तीबाबत ठाकरे म्हणाले, ‘‘हेल्मेटसक्ती म्हणजे सत्तेत आल्यानंतरचे शहाणपण आहे. माणसांचा जीव वाचावा असे जर या सरकारला वाटत असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण त्याआधी रस्ते चांगले आहेत का? तसेच हेल्मेट घातल्याने हॉर्न ऐकायला येत नाही. वाहन चालवताना त्रास होतो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मग सक्ती कशाला?’’

गांधी कुटुंब संसदेत काम करू देत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याचे मी आजच वाचले. आधी सर्व गोष्टींना विरोध करायचा. आता कॉंग्रेस काम करू देत नाही म्हणून टीका करीत आहेत. 
- राज ठाकरे