शुक्रवार, 7 फ़रवरी 2014

राज ठाकरे यांची सभा मुठा नदीच्या पात्रात

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा अखेर मुठा नदीच्या पात्रात घेण्याचे शुक्रवारी निश्‍चित झाले. सभा कोठे होणार, याबाबत गेले चार दिवस सुरू असलेली चर्चा यामुळे थांबली असून मनसेचे पदाधिकारी तातडीने सभेच्या नियोजनात मग्न झाले आहेत.

राज ठाकरे यांची सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याचा "मनसे'चा प्रयत्न होता; परंतु मैदान उपलब्ध न झाल्यामुळे तो अयशस्वी झाला. अलका टॉकीजच्या चौकातही पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या टिळक रस्त्यावरही सभा घेण्यासाठी मनसेला मैदान उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे सभा घ्यायची कोठे, असा प्रश्‍न मनसेपुुढे होता. त्यातच मनसेने काही ठिकाणी फ्लेक्‍स लावले, त्यात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार, असे म्हटले होते. त्यामुळे सभेबाबत कुतूहल निर्माण झाले होते.

नदीपात्रात मनोरंजननगरी मागे आणि "एसएसपीएमएस'चे मैदान या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिली होती. नदीपात्रात मनोरंजन नगरीच्या मागे सभा घेण्याचा निर्णय मनसेचे सरचिटणीस दीपक पायगुडे आणि शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी जाहीर केला. नदी पात्रात मंडप उभारणीसाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांनी पाहणी केली. शनिवारी सकाळपासून मंडप उभारण्यात येणार आहे. संभाजी उद्यानातून तसेच पुलाची वाडी मधून कार्यकर्ते सभास्थळी पोचू शकतील, असे ढोरे यांनी सांगितले. या सभेसाठी शहरातील चारही दिशांच्या उपनगरांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

रविवार, 2 फ़रवरी 2014

मुंबईत येऊन बाळासाहेबांनाच विसरता - राज

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मुंबईत सभा घेतात आणि येथे येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेत नाही, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मनसेने आयोजित केलेल्या जेष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. राज यांनी आपण नऊ तारखेला पुण्यात सभा घेऊन पुढील वाटचाल जाहीर करणार असल्याचे सांगितले. 

राज म्हणाले, ''मोदी मुंबईला गुजराती नागरिकांचे माहेरघर असल्याचे सांगतात. मग, महाराष्ट्रातील मराठी नागरिकांचे महाराष्ट्र हे काय सासर आहे का? गुजराती लोक गुजरातला काय म्हणतील. याठिकाणी येऊन कोणीही संयुक्त महाराष्ट्राच्या जखमांवरील खपल्या काढायचे काम करू नये.''

मुंबईत अनेक ठिकाणी जैन समाजातील नागरिकांकडून टॉवर उभारले जात आहेत. तरीही केंद्र सरकारकडून जैन समुदायाला अल्पसंख्यांकाचा दर्जा दिला गेला आहे. आज अशी परिस्थिती आहे, की लालबाग, परळ भागात मराठी माणसालाच अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याची गरज आहे, असे राज यांनी म्हटले

खऱ्या कलावंतांकडेच वेगळा "अँगल' - राज ठाकरे

पुणे - ""एखादी दर्जेदार कादंबरी लेखक शब्दबद्ध करतो किंवा एखादा चित्रकार प्रभावी व्यंग्यचित्र रेखाटतो. कारण, त्या कलावंतांकडे मुळातच वेगळा "अँगल' असतो. त्यामुळेच, उत्तम कलाकृती तयार होते. पण, त्या जन्माला येण्याआधी कलावंताला कल्पना सुचते कशी, हे फार महत्त्वाचे आहे. पण, ते शब्दांत सांगता येत नाही,'' असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

"ग्रंथाली'च्या समारंभात समीरण वाळवेकर लिखित "चॅनल 4 लाइव्ह' कादंबरीचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, साहित्यिक अरुण साधू, "सकाळ' (मुंबई)चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, पत्रकार राजीव खांडेकर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ""दर्जेदार कलाकृती पुनःपुन्हा पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच, "सिंहासन'सारखा चित्रपट पुन्हा रसिकांसमोर आला नाही. "चॅनल 4 लाइव्ह' ही कादंबरीसुद्धा वेगळा दृष्टिकोन ठेवूनच लिहिली गेलेली आहे.''

डॉ. पटेल म्हणाले, ""समाजातील गंभीर प्रश्‍न सोडून देऊन माध्यमांमध्ये वेगळेच प्रश्‍न हाताळले जात आहेत. अशा स्थितीत एकमेकांमध्ये स्पर्धाही वाढली आहे. त्यामुळे समाजात मानसिक चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. लोकशाहीला धक्का लागेल असे वर्तन माध्यमांच्या हातून होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी.''

साधू म्हणाले, ""पूर्वी माध्यमांची प्रतिमा साजूक होती. ती आता धक्कादायक, भीतीदायक झाली आहे. राजकारणाचे क्षेत्र जेवढे कुरूप आहे तेवढेच ते माध्यमांचेही झाले आहे. त्यामुळेच, लोकशाही धोक्‍यात आली आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर दोनही क्षेत्रात संयम नियंत्रणाची आवश्‍यकता आहे.'' कॅमेऱ्यामागचे जग लोकांसमोर यावे, हा उद्देश ठेवून मी ही कादंबरी लिहिली, असे वाळवेकर यांनी सांगितले.

जे काही बोलायचे ते रविवारी... सभागृहात पोलिस बसले होते. काही पोलिस सर्व घटना लिहूनही घेत होते. हे चित्र व्यासपीठावरील ठाकरे यांनी बरोबर टिपले. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच याकडे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत ते म्हणाले, ""इथं पोलिस का आलेत, हे मला माहीत नाही. पण, मी कुठं सापडतोय का, हे पाहण्यासाठीच ते इथं आले असावेत. मी असा-तसा नाही सापडणार. मला जे काही बोलायचं आहे, ते मी याच पुण्यात बोलेन. पण, येत्या रविवारी (ता. 9) होणाऱ्या जाहीर सभेत.''