शुक्रवार, 17 जनवरी 2014

नवआकांक्षावादी खेळाडूचे "मनसे'समोर आव्हान

जनतेच्या इच्छा-आकांक्षांची जाण राज ठाकरे यांना आहे, हे मध्यमवर्ग निष्ठेने मानत राहिला. मराठीच्या आग्रहाने, उत्तम भाषणाने आणि प्रचलित पक्षांना मोजत नाही, या गुर्मीने राज मध्यमवर्गाला जिंकत गेले. नेमक्‍या याच वर्गात आता शिरलेल्या "आप' या नव्या भिडूशी सामना हे मनसेसमोरचे मोठे आव्हान आहे
निकाल लागले दिल्ली विधानसभेचे, पण परिणाम झाले अवघ्या देशाप्रमाणेच मुंबईवर. अरविंद केजरीवाल यांच्या यशाने सारेच राजकारणी गडबडले. पर्यायी पक्ष म्हणून समोर येणाऱ्या मनसेसारख्या पक्षांसमोर तर मोठेच आव्हान उभे राहिले. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत गुंतले असताना मनसेचे मौन बोलके ठरते आहे. नाशिकहून मुंबईत परतल्यावर राज ठाकरे महत्त्वाच्या भेटीगाठी घेत आहेत असे समजते. अगोदर स्वत:च वंदनीय ठरवलेले नरेंद्र मोदी आणि नवेनवेले अरविंद केजरीवाल हे नेते आज मनसेच्या कुंडलीतले राहू-केतू ठरले आहेत. त्यांचा प्रभाव क्षीण करीत पुढचा मार्ग कसा शोधायचा याचे आव्हान राज यांच्यासमोर आहे. त्यातून ते कसा मार्ग काढतात याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

शिवसेनेत नेतृत्वाला वाव नाही, हे लक्षात येताच राज बाहेर पडले. केवळ त्याच विचारांची दुसरी चूल मांडून न बसता त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी स्वतःसाठी जागा निर्माण केली. ही किमया त्यांनी केवळ काही वर्षांत साधली. प्रतिकूल वातावरणात वडिलांच्या पुण्याईवर शिवसेनेचे संघटन राखून ठेवण्याचे कसब उद्धव यांनी दाखवले. पण राज मात्र झपाट्याने वेगळ्या मतदारांना आकर्षित करू शकले. मतदारांना पर्यायी राजकीय व्यवस्था हवी होतीच. विशिष्ट परिघात फिरणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये राम नाही हे मानणाऱ्यांची पिढी सज्ञान झाली होती. त्या पिढीवर, त्यांच्या भावनांवर राज स्वार झाले. मनसेच्या वाढीचे श्रेय "खळ्‌ळ खट्‌टॅक'वर श्रद्धा असणाऱ्या नाकागुंडांपेक्षाही नवे काहीतरी घडविण्याची ऊर्मी असलेल्या निम्न ते उच्च मध्यमवर्गीयांना द्यावे लागेल. नाशिक, कल्याण- डोंबिवली, पुणे अशा महापालिकांत याच वर्गाने मनसेच्या पारड्यात भरभरून मते टाकली. प्रचलित पक्षांपेक्षा वेगळा नवा पर्याय हे या निवडीमागचे कारण होते. राज यांच्या व्यक्‍तिमत्त्वाला, वक्‍तृत्वाला निवडून आलेले बहुतांश लोकप्रतिनिधी उत्तम कामाची जोड देऊ शकले नाहीत. पण अशी निराशा वाट्याला आली, तरी नव्या ठिकाणी नवी जनता राज यांच्या रसवंतीला भुलत राहिली. नागरिकांच्या इच्छा-आकांक्षांची जाण राज यांना आहे, हे महाराष्ट्रातील मध्यमवर्ग निष्ठेने मानत राहिला. मराठीच्या आग्रहाने, उत्तम भाषणाने आणि प्रचलित पक्षांना मोजत नाही या गुर्मीने राज मध्यमवर्गाला जिंकत गेले. नेमक्‍या याच वर्गात आता नवा भिडू शिरला आहे. परिवर्तनाची आस असलेल्या मध्यमवर्गीयांना सुशासनाची स्वप्ने दाखवणारा. किंबहुना, सरकार या प्रक्रियेचे मायबाप तुम्ही आहात याची कायम जाणीव देणारा. आकांक्षा पेरणारा. काही वर्षांपूर्वी याच दिशेने मनसे जात होती. मुंबई म्हणजे दिल्ली नाही हे मान्य. महाराष्ट्राच्या पंचधृवीय राजकारणात "आप' वेगळी जागा निर्माण करू शकणार नाही हेही मान्य. पण नवमतदारांचा हा पक्ष एखाद्याच्या जागेत घुसखोरी करू शकेल. ही जागा मनसेची तर नसेल? कोपराने जागा करून घेणाऱ्या या नवआकांक्षावादी खेळाडूशी सामना हे मनसेसमोरचे आव्हान ठरणार आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे यावे असा मनसेचा "रोडमॅप'. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा दोघांना "रडार'वर ठेवण्याची गरज होती. प्रादेशिक पक्षांच्या सुवर्णकाळाचा लाभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना झाला. आता परिस्थिती बदलली आहे. वेगळ्या वांशिक भावनांमुळे दक्षिणेत द्राविडी प्राणायाम यशस्वी होतीलही, पण महाराष्ट्राचे तसे नाही. राष्ट्रीय बाण्यापासून आपण कायम फटकून वागत नाही. येथे प्रादेशिक अभिनिवेश केवळ तोंडी लावण्यापुरता असतो. त्यामुळे मनसेला या मुद्‌द्‌याचा अस्तित्वासाठी कितपत वापर करता येईल शंका आहे. "एण्ड ऑफ आयडिऑलॉजी'चा हा काळ आहे काय? खोऱ्याने पैसा ओढणारे राजकारणी निवडणुकीत हात मोकळे सोडतात, मग का न त्यांच्याकडून सोसायटीला रंग देऊन घ्या, अशा मानसिकतेपर्यंत गेलेल्या मतदारांना आता मूल्याधारित राजकारणाची स्वप्ने पडू लागली आहेत. भाषा-प्रांत-जात यापेक्षा आमच्या आकांक्षांची दखल घ्या, असे मानणारा वर्ग वाढला आहे. आकांक्षापूर्ती हीच आयडिऑलॉजी. कायम पर्यायाच्या शोधात असलेल्या मतदाराला असा ध्येयवाद भावतो. ध्येयवाद हरवलेले नेते ही जनतेची समस्या होती. आता पर्याय उभा आहे. राष्ट्रवादी भावनांना हाकारत समृद्ध भविष्याची हमी देणारे मोदी आणि भ्रष्टाचारावर झाडू मारणारे केजरीवाल हे सध्या तेजीत आहेत. व्ही. पी. सिंहांचे जे झाले तेच कदाचित केजरीवालांचेही होईल, पण त्याला अजून वेळ आहे. नेमक्‍या याच कालावधीत राज यांना पक्ष पुढे न्यायचा आहे. मोदींना नामोहरम करणारे विषय त्यांनी शोधून काढले आहेत खरे, पण त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा भाजपतला मोठा वर्ग नाराज होईल. मोदींच्या निवडणूक तयारीचा मान राखत उद्धव यांनी पडते घेतलेले दिसते. महायुतीत आता स्वाभिमानी पक्षासारख्या नव्यांचा समावेश करत शिवसेना बेरजेचे राजकारण करते आहे. त्यांना मुख्यमंत्री करायला निघालेल्या नवागत सुपुत्र आदित्यला ते युक्‍तीच्या चार गोष्टी सांगतील का माहीत नाही. पण प्रश्‍न त्यांचा नाहीच. ते बचाव फळीचे खेळाडू आहेत, तर राज विस्ताराच्या. सोनिया गांधी कॉंग्रेसजनांच्या खुशामतखोरीला विनम्रपणाच्या बुरख्याआडून धूर्त लगाम लावत मुलाला पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर ठेवत असताना, इकडे मात्र मुलगा वडिलांच्या राज्याभिषेकाचा अश्‍वमेध सुरू करतो आहे. पण शिवसेनाप्रमुखांनंतरच्या शिवसेनेला बरेच गुन्हे माफ आहेत. राज यांचे तसे नाही. ते गादी सांभाळणारे नाहीत तर पीठ निर्माण करणारे नेते आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी केलेल्या धरसोडीचे हिशेब त्यामुळे मागितले जाणार आहेत हे निश्‍चित. अन्यायकारक टोलविरोधात महाराष्ट्रात सर्वप्रथम आवाज उठविला तो मनसेने. मग अचानक मुद्दा मागे पडला कसा? महायुतीत न जाता स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे असेल, तर कॉंग्रेस -राष्ट्रवादीला मदत करणारा पक्ष अशी टीका होईल, त्याचे उत्तर काय द्यायचे या प्रश्‍नाचे उत्तर मनसेला, पर्यायाने राज यांना द्यायचे आहे. मनसेची पुढची दिशा हा महाराष्ट्राच्या राजकारणात आज कळीचा मुद्दा झाला आहे.