शनिवार, 8 सितंबर 2012

अराजकधर्म सोडावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।

अराजकधर्म सोडावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।। (हेमंत देसाई)
हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com
Sunday, September 09, 2012 AT 03:45 AM (IST)

राज ठाकरे यांचं नेतृत्व उद्या देशस्तरावरही फुलू शकतं. राज्याराज्यांतल्या प्रादेशिक अस्मितांचे ते "सेंट्रल हीरो' बनू शकतात. मात्र, हे करताना त्यांनी विधायक आणि विकासाधारित राजकारण करायला हवं.

"माझ्या डोक्‍याचा पारा चढवू नका...' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सिंघम'मधल्या अजय देवगणप्रमाणं "आता माझी सटकली' असा इशारा हावभाव करत बिहारला दिला, तेव्हा पुन्हा एकदा माध्यमकेंद्रित "हाय ड्रामा' निर्माण झाला...

"बिहारमध्ये जाऊन गुन्हेगारांना पकडणाऱ्या महाराष्ट्राच्या पोलिसांवर जर अपहरणाच्या केसेस टाकल्या, तर इथल्या बिहारींना घुसखोर ठरवून हाकलून दिलं जाईल', अशी थेट धमकी देऊन राज पुन्हा मूळपदावर गेले."आपली विधानं महत्त्वाचे शब्द गाळून विकृत स्वरूपात दाखवणाऱ्या हिंदी चॅनेल्सचा खेळ थांबवू,' अशी गर्जनाही त्यांनी केली. 11 ऑगस्टला आझाद मैदानाच्या दिशेनं मोर्चा काढून राज यांनी पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं आणि "आता पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या अंगाला हात लावाल तर...,' असा पवित्रा घेत पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या मतदारसंघांवर ताबा मिळवला आहे. पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्यावर मनसेनं इतके दिवस भर दिला नव्हता. "26/11' नंतर राजकीय संबंध तोडूनही उपयोग होत नाही, हे लक्षात आल्यावर भारतानं पाकिस्तानबरोबरचा व्यापार वाढवला. व्हिसा-निर्बंध सैल केले. शिवसेना वा मनसेनं याला ठोस विरोध न करता, कलावंतांचं "सॉफ्ट टार्गेट' निवडलं. पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांची मैफल उधळणारी शिवसेना व "कलर्स' या वाहिनीला धमकावणारी मनसे यात फरक राहिलेला नाही.

"माय नेम इज खान'च्या प्रदर्शनाला शिवसेनेनं विरोध दर्शवला, राहुल गांधींविरुद्ध निदर्शनं केली, त्या वेळी मनसे शांत राहिली होती. आज मात्र मनसेनं पाकिस्तानी कलावंतांविरुद्ध भूमिका घेतली व शिवसेनेनं त्याची "री' ओढली. काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या "बिहारदिना'च्या वेळी राज यांनी वातावरणात सुरुंग पेरले, तेव्हा शिवसेना बघ्याच्या भूमिकेत होती. त्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अत्यंत चतुराईनं परिस्थिती हाताळली व संघर्ष टाळला. आज राज यांनी संघर्ष उकरून काढला असताना, नितीशकुमार यांच्यासारख्या नेमस्त नेत्यानं राज यांना "सरफिरा' असं संबोधून वातावरणात आरडीएक्‍स ठासून भरलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका बिहारी मंत्र्यानं "राज यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरावा,' अशी मागणी केली, तेव्हा महाराष्ट्रात मनसेसमवेत महायुतीसाठी गोपीनाथ मुंडे-सुधीर मुनगंटीवार आग्रही असल्याचं त्या मंत्र्याच्या गावीही नसावं... संयुक्त जनता दलाचे जुने-जाणते, मूळचे समाजवादी नेते शिवानंद तिवारी यांनी तर "कॉंग्रेसचेच नेते महाराष्ट्रात "राजरूपी भिंद्रनवाले'ला जन्म देत आहेत,' असा आरोप केला...तर "ठाकरे घराणं मूळचं बिहारचं आहे,' असा जावईशोध कॉंग्रेसचे "पोपटराव' दिग्विजयसिंग यांनी लावला.

थोडक्‍यात, राज ठाकरे यांना जे पाहिजे, तेच घडत गेलं. वाहिन्यांच्या साक्षीनं वादग्रस्त व जहरी वक्तव्यं करायची, लोकांना "प्रोव्होक' करायचं, मराठी विरुद्ध परप्रांतीय, असा विरोध निर्माण करायचा आणि आपणच महाराष्ट्राचे व मराठीचे तारणहार असल्याचा भ्रम तयार करायचा, ही राज यांची व्यूहरचना आहे. "वेक अप सिद' या चित्रपटात नायिका कोंकणा सेन हिच्या तोंडात "बॉम्बे' हा शब्द येतो, तेव्हा त्याला मनसेनं आक्षेप घेतला. मग निर्माता करण जोहर राज यांना भेटला व नंतर चित्रपटात "मुंबई' असा उल्लेख करण्यात आला. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबद्दल शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी हरकत घेतली व "माय नेम इज खान'च्या प्रदर्शनात अडथळा आणला. वातावरण थंडावल्यानंतर काही दिवसांतच "सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात या चित्रपटाची पूर्ण पान जाहिरात प्रसिद्ध झाली होती...!

"ठाकरे मूळचे भोर संस्थानातील पाली ह्या गावचे; पण आमचा नि पालकर ठाकऱ्यांचा आडनावापलीकडं फारसा संबंध कधीच आलेला नाही, घोडपकर असेही आमचे एक जादा आडनाव आहे; पण आमचे वडील किंवा ठाकरेबंधू या आडनावाच्या आडवळणाला फारसे कधी गेले नाहीत. नाशिक जिल्ह्यात घोडप किल्ला आहे. तेथे आमचे एक पूर्वज किल्लेदार होते', असं "प्रबोधन'कार ठाकरे यांनी "जीवनगाथा' ह्या त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे.



"प्रबोधन'कारांचं वय 18 असतानाच त्यांचे वडील वारले. लहान-थोर दहा-बारा माणसांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. खरं तर "प्रबोधन'कारांचं शिक्षण देवास इथं झालं. आज देवास (शास्त्रीय गायक दिवंगत कुमार गंधर्व यांचं गाव) मध्य प्रदेशात आहे. देवास संस्थानात त्यांचे मामा वकिली करायचे. ते "प्रबोधन'कारांना घेऊन देवासला गेले आणि त्यांनी तेथील व्हिक्‍टोरिया हायस्कुलात त्यांचं नाव दाखल केलं. धारचे लेलेमास्तर भूगर्भशास्त्रापासून ते मिल्टन, ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांचं काव्य शिकवत. ऍनी बेझंट आदींची व्याख्यानंही तिथं होत असत. व्हिक्‍टोरिया क्‍लासमध्ये "प्रिन्सिपॉल गंगाधर नारायण शास्त्री, एम. ए.' यांच्यापुढं "प्रबोधन'कार प्रवेशासाठी गेले. तेव्हा त्यांनी सुरवातच इंग्लिशमधून केली...

देवासमध्ये सब कुछ हिंदी होतं. हिंदी, मराठी, उर्दू सगळ्या शाळांतलं शिक्षण मोफत होते. 1902 मध्ये देवासहून परतल्यावर पुढच्या सहा-सात वर्षांत अधिक शिक्षणासाठी आणि नंतर कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी "प्रबोधन'कारांनी नाना उद्योग केले. नोकरीसाठी आजूबाजूच्या गावांतून कुणीही तरुण आला, की ते त्याला वृत्तपत्राच्या कार्यालयात घेऊन जायचे. तिथं "वॉंटेड'च्या जाहिराती दाखवायचे आणि नोकरीसाठी अर्ज लिहून देण्याचं काम करायचे. मुंबईत नोकरीसाठी कुठून कुठून लोक येतात, हे "प्रबोधन'कारांना ठाऊक होतं. नाटकात शिरल्यानं त्यांनी महाराष्ट्रपर्यटन केलं आणि नाना उपक्रमांसाठी ते देशात इतरत्रही फिरले. त्यांना बऱ्याच भाषा यायच्या आणि लोकमान्यांपासून ते नाथमाधवांपर्यंत अनेकजणांशी त्यांचा परिचय होता. त्यामुळे त्यांची दृष्टी व्यापक झाली. याउलट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुळात फारसं फिरलेले नाहीत. त्यांचं वाचन चौफेर असलं, तरी दृष्टी व्यापक नाही. त्यामुळे 1969 मध्ये शिवसेनेनं "यंडूगुंडूं'ना "टार्गेट' करताना "मुंबईचा कलकत्ता होईल,' अशी गर्भित धमकीही दिली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडतानाच "यंडूगुंडूं'च्या हॉटेलांचीही जाळपोळ केली गेली.

"बिहारनं मुंबई पोलिसांना गुन्हेगारांसाठी आत येऊ न दिल्यास आम्ही छत्रपतींच्या भूमीतले आहोत, हे दाखवून देऊ' असे उद्गार बाळासाहेबांनी काढले आहेत. नितीशकुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले (रालोआ) एका पक्षाचे नेते असले, तरी "देशापेक्षा महाराष्ट्र मोठा,' ही शिवसेनेची लाईन आहे. दुर्दैवानं मनसेचं रूपांतर आता शिवसेनेत होऊ लागलं आहे. त्यामुळे बांगलादेश घुसखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरणारे राज बिहारींनाही घुसखोर ठरवू लागले आहेत. राज हे "जर-तर'ची शब्दयोजना करत असले, तरी त्यांचे काही सहकारी मुंबईतील सगळ्याच बिहारींना घुसखोर मानत आहेत. अशा वक्तव्यांमुळं उद्या मुंबईत भाषिक दंगे झाले, तर त्यांना कोण जबाबदार असेल? गंमत म्हणजे, "पृथ्वीराज चव्हाण सरकारनं राज यांच्या प्रक्षोभक भाषणांकडं दुर्लक्ष करून सरकारी गव्हर्नन्स आउटसोर्स केलं आहे' असा आरोप करून नितीशकुमार यांनीही सुजाणपणाशी फारकत घेतलेली आहे. वास्तविक मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी हा केवळ मनसेच्या मागणीचा परिपाक नव्हता, तर एकूणच जनमताचं दडपणही होतं. हे दडपण "रिलीज' होण्यासाठी कारवाई करणं जरुरीचं होतं. काही वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ ह्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांना अटक करून दाखवली खरी; पण तेव्हा शहरातलं टेन्शन वाढलं होतं. शिवाय ठाकरे ह्यांच्या अटकेनं साधलं काय? उद्या राज ह्यांच्यावर अशीच कारवाई केल्यास तिचे काय परिणाम होतील? बाबा-आबा मोठे होतील की राजच, ह्याचा डोकं शांत ठेवून विचार केला पाहिजे.राज ह्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला राजकीय आखाड्यात उतरावं लागेल. न्यायालयात खटले दाखल करून त्यांचा पाठपुरावा करावा लागेल. राज यांची भडक विधानं वाहिन्यांवरून किती व कशी दाखवावीत, हे माध्यमांनीही पाहिलं पाहिजे.

पण प्रश्‍न केवळ तेवढाच नाही. आज पश्‍चिम बंगाल सरकारवर टीका करणाऱ्या लेखक-पत्रकार-व्यंगचित्रकारांची "ममते'नं मुस्कटदाबी सुरू आहे. जयललिता यांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कार्यकर्त्यांनीही असहिष्णुतेचं प्रदर्शन केलं होतं. आज श्रीलंकेतील पर्यटकांना तामिळनाडूत पाऊल ठेवण्याचीही भीती वाटत आहे. आसाममधील कोक्राझारमध्ये बोडो आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संघर्षात देशातील विविध जाती-धर्मांचे लोकही भरडले गेले. या हिंसाचारानंतरच्या पाकिस्तानपुरस्कृत टेक्‍नो-अपप्रचारामुळे पुण्यापासून बंगळूरपर्यंत सर्वत्र ईशान्य भारतीयांची पळापळ सुरू झाली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात परप्रांतीयांना मारहाण झाल्यामुळं पुणे, नाशिक, मुंबईतील भय्ये भयभीत होऊन आपापले गमछे तोंडासमोर धरून पलायन करते झाले...

बाळासाहेबांनी पूर्वी शीख समाजावर बहिष्कार टाकण्याची हाक दिली होती. "मुसलमानांनो, इथं राहायचं असेल, तर हिंदुस्थानचे नागरिक होऊन राहा' अशी त्यांची विधानं प्रसिद्ध आहेत. "आमच्या आघाडीचं सरकार केंद्रात आले, तर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा चुटकीसरशी निकाल लावू,' "मी पंतप्रधान झालो, तर आठ दिवसांत काश्‍मीर प्रश्‍न सोडवीन' अशीही त्यांची विधानं आहेत. राज यांच्यासमोर केवळ बाळासाहेबांचाच नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचाही आदर्श आहे. सन 1969 वा 1992-93 मधले आक्रमक बाळासाहेब आधी मराठीहृदयसम्राट व मग हिंदुहृदयसम्राट झाले. शिवसेना मुंबईहून मराठवाडा-विदर्भापर्यंत विस्तारली. "विकासाचे मुद्दे घेऊन लोकप्रियता मिळणार नाही, तेव्हा बाळासाहेब वा मोदी यांच्याप्रमाणं प्रथम भावना पेटवण्याचं राजकारण करावं व मग सत्ता आल्यावर विकासाचं पाहू या,' ही राज यांची योजना दिसते. त्यामुळे मनसेचे काही आमदार व नगरसेवकही विकासाचं कोणतंही काम करत नाहीत. "निवडणुका आल्या की विकासाचा अजेंडा मांडू', असं राज म्हणतात. कार्यक्रमाच्या आधारे नव्हे, तर टाळ्याखाऊ भाषणांच्या आधारेच राजकारण करण्याचा व निवडणुकाही जिंकण्याचा हा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण मानावा लागेल. इतरांना वगळणारं, हुल्लडबाजीचं, आगलावू राजकारण ही शिवसेनेची स्टाईल. राज ह्यांनी या राजकारणाला अभ्यासाची जोड दिली. पत्रकारांवर कधीही हात चालवला नाही, मराठी पुस्तकांची प्रदर्शनं भरवली, तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरं घेतली, हुशार व तळमळीची माणसं पक्षाशी जोडली.

उद्या राज यांचं नेतृत्व देशस्तरावरही फुलू शकतं. राज्याराज्यातल्या प्रादेशिक अस्मितांचे ते "सेंट्रल हीरो' बनू शकतात. ते बाळासाहेबांपेक्षाही मोठे होऊ शकतात; पण त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांचे गुण घेताना दोष टाळले पाहिजेत. विद्वेषी, विखारी राजकारण सोडलं पाहिजे. मुंबईवर लोंढ्यांचा ताण येत आहेच; परंतु हा प्रश्‍न पायाभूत सुविधांशी जोडला पाहिजे. बिहार, उत्तर प्रदेशात जाऊन आपले मुद्दे तिथल्या जनतेला पटवून दिले पाहिजेत. मुंबई-पुणे-नाशिकमधील परप्रांतीयांचे मेळावे घेऊन त्यांना "मराठी संस्कृती म्हणजे काय,' हे प्रेमानं समजावून सांगितलं पाहिजे. त्यांना मराठी भाषा शिकवली पाहिजे.

राज्यात येणाऱ्यांची नोंद ठेवायलाच हवी; पण केरळात तशा फक्त हालचालीच सुरू आहेत. गोव्यात प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री असताना ते करून दाखवलं; कारण गोव्यात परदेशी पर्यटकांवरील हल्ले वाढले होते. आपल्याकडं "आधार कार्डा'चा उपयोग करून लक्ष ठेवता येऊ शकतं.

मुंबईतील परप्रांतीयांची गुन्हेगारी वाढली आहे, हे कॉंग्रेस पक्षानंही मान्य करून टाकावं. सुरक्षारक्षक, मोलकरणी यांची माहिती पोलीस ठाण्यांना देण्याचं कर्तव्य हाउसिंग सोसायट्यांत राहणारे मध्यमवर्गीयही बजावत नाहीत. प्रगत देशांत नोंदी चोख असतात, त्यामुळे गुन्ह्यांचा शोध त्वरेनं लागतो. बिहार, उत्तर प्रदेशातील लोकांबद्दल शीला दीक्षित, पी. चिदंबरम यांनीही टीका केली होती. तिथले लोक नियम पाळत नाहीत, असं मत एका न्यायाधीशांनीही व्यक्त केलं होतं. तेव्हा हे फक्त राजच बोलतात असं नव्हे.

राज ठाकरे यांना लाखोली वाहणाऱ्यांनी आपल्या चुकांचाही विचार केला पाहिजे. तसा ते तो करत नाहीत. मनसेला वा मोदींना टार्गेट करून मुसलमानांमधील व बिहारींमधील मतं वाढतात, असं नितीशकुमारांना वाटतं. एकूण, राज व नितीशकुमार एकमेकांना वाढवत आहेत!

आज नागपूरसारख्या शहरात हा संघर्ष दिसत नाही. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बालाघाट, सिवनी या जिल्ह्यांमधील लोक नागपुरात येऊन रिक्षा चालवतात. छत्तीसगड मजूर बांधकामाच्या "साइट्‌स'वर दिसतात. भाजी मार्केटमध्ये छत्तीसगढी स्त्रिया टोपल्या उचलतात. चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यांना लागून असलेल्या आंध्र प्रदेशातून शेकडो लोक नागपूरला येऊन चाटविक्रीचा व्यवसाय करतात. पाव-भाजी, पुलाव तयार करण्यात राजस्थानी, फळविक्रीत उत्तर प्रदेशी, तर भेळ-पुरीच्या व्यवसायात बिहारी आहेत.

मध्य प्रदेश व छत्तीसगड ह्या राज्यांतील काही शहरं पूर्वी मध्य प्रांताचा भाग होती. तिथल्या बऱ्याच मुली नागपुरातील घरच्या सुना होऊन सुखानं नांदत आहेत. त्यामुळे हिंदी भाषा नागपूरच्या जनजीवनाचा भाग आहे. वर्षानुवर्षं नागपुरी असणारे पंजाबी, सिंधी, हिंदी, गुजराती, दाक्षिणात्य आपापल्या भाषांत बोलतात व मराठीभाषकही एकमेकांशी हिंदीत बोलतात.

हे चांगलं की वाईट हा निवाडा कोण करणार? राज यांना विकास हवा असेल, तर या प्रक्रियेत स्थलांतरितांचा समावेश करावाच लागणार. कारण त्यांच्यामुळं वेतनावरचा खर्च कमी होतो. मनसेच्या धमक्‍यांमुळं इथले परप्रांतीय कायमचे गावी गेले, असं झालं नाही व होणारही नाही. आज अर्ध्या दादरवासीयांची मुलं-मुली युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलियात आहेत. त्यांनाही तिथून हाकलता येणार नाही.

मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा
हे समर्थ रामदास यांचं वचन आपल्याला ठाऊकच आहे. शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्रात जी राज्यक्रांती घडवून आणली, त्यापूर्वी मराठी साधू-संतांनी सामाजिक क्रांतीनं महाराष्ट्रातील जनतेला जागृत केलं होतं. जन्ममूलक वर्णभेद, आचार, संप्रदाय, यज्ञयाग, कर्मकांडाच्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला केला होता. संतांचं आवाहन माणुसकीसाठी होतं. राज यांनी मनसेला अवश्‍य मोठं करावं, स्वतःही मोठं व्हावं; पण महाराष्ट्राला कुठंही छोटेपण आणू नये. मराठीपण विस्तारावं आणि स्थलांतरितांचे प्रश्‍न आर्थिक-सामाजिक चौकटीतच सोडवावेत. नाहीतर "मनसे गयी मन से' असंच लोक म्हणतील!

महाराष्ट्रातच का?
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी "मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष' या ग्रंथात विचारलं आहे , "भारतामध्ये येणाऱ्या प्रत्येक परकीय सत्तेशी टक्कर देण्याचा प्रयत्न प्रथम महाराष्ट्रातच का झाला?' याचं उत्तर त्यांनीच असं दिलं आहे, ""आपली स्वभावतःच ठेवण अशी आहे, की महाराष्ट्रातल्या लोकांचा उत्कर्ष झालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या पश्‍चिमेस सह्याद्री आहे व उत्तरेस विंध्याद्री व सातपुडा. त्यांच्या दऱ्या-खोऱ्यातून उगम पावणाऱ्या व गोदावरी व कृष्णेला मिळणाऱ्या लहानसहान नद्यांचे जाळे आहे. बहुतेक टेकड्यांवरील किल्ल्यांमुळे महाराष्ट्राचा बचाव स्वभावतःच होतो. उत्तर हिंदुस्थानासारखी आपल्याकडील हवा कधी अती थंड तर कधी अती उष्ण नाही. हवा उत्साहजनक असून लोक सशक्त, काटक व काटेकोर आहेत. मराठी माणसाच्या अंगी स्वाभिमान, बाणेदारपणा तुडुंब भरलेला आहे. यालाच आम्ही मराठीपण म्हणतो.''

या मराठीपणाचे "महाराष्ट्र नवनिर्माण सेना'कृत प्रदर्शनीय सामने आपण अलीकडील काळात पाहिले आहेत; पण मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून निर्माण झालेली शिवसेना व तिच्या उदरातून जन्माला आलेली "मनसे' रोजगार, व्यवसाय, प्रशिक्षण याविषयी आज बोलत नाही



शुक्रवार, 7 सितंबर 2012

‘महाराष्ट्र’की ‘मांडवली’धर्म ?

 ‘महाराष्ट्र’की ‘मांडवली’धर्म ?
राज ठाकरेंच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
खास प्रतिनिधी
मुंबई
आधी विरोध करून मग ‘सूरक्षेत्र’ या कार्यक्रमाला मान्यता देण्यात राज ठाकरे यांचा ‘महाराष्ट्र’ की  ‘मांडवली’ धर्म आहे, असा सवाल काँग्रेसने आज केला आहे. तर प्रक्षोभक भाषणाबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज ठाकरे यांनी टोल नाक्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. पण या आंदोलनाचे आता काय झाले, असा सवाल काँग्रेसने केला आहे. राज ठाकरे हे अचानक आक्रमक होतात आणि नंतर एकदम थंड कसे होतात याचे गुपित काय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते संजय दत्त आणि जनार्दन चांदूरकर यांनी केला आहे. बिहार दिन, टोल आंदोलन यावरून राज ठाकरे हे कसे बदलतात हे सिद्ध झाल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे. अन्य प्रांतीयांच्या विरोधात वक्तव्य करून समाजात फूट पाडणे किंवा बंदी हुकूम मोडून मोर्चा काढल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. काँग्रेसने मनसेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच प्रांताच्या मुद्दय़ावर कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. काही जण केवळ व्होटबँकेसाठी जात आणि प्रांताचा वापर करतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.







गुरुवार, 6 सितंबर 2012

मनसेचे 'सूरक्षेत्र' जुळले

मनसेचे 'सूरक्षेत्र' जुळले
Friday, September 07, 2012 AT 01:45 AM (IST)

मुंबई- पाकिस्तानी गायकांचा सहभाग असल्यावरून गेले काही दिवस "सूरक्षेत्र' या कार्यक्रमाला तीव्र विरोध करणाऱ्या मनसेने आज एक पाऊल मागे घेतले. "सहारा' आणि "कलर्स' या वाहिन्यांचे वरिष्ठ अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटताच त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसारणास हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे आता ठरलेल्या दिवशीच आणि वेळेतच हा कार्यक्रम प्रसारित होईल.

याआधी कार्यक्रम करूनच दाखवा, मनसे "खळ्ळ खट्याक्‌' करेल, अशी गर्जना करणाऱ्या मनसेने अचानक आंदोलनाची तलवार म्यान केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यात शिवसेनेने मात्र आपला पाकिस्तानी कलाकारांविरोधातील पवित्रा कायम ठेवला आहे. शिवसैनिक आर्कुट आणि फेसबुकवरून आपला विरोध व्यक्त करणार आहेत.

पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू देणार नाही, अशा प्रकारची धमकी शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्वाने दिली होती. असे असतानाही आज कित्येक पाकिस्तानी कलाकार व गायक इंडस्ट्रीत काम करीत आहेत. पाकिस्तानी गायकांचे एकापाठोपाठ एक अल्बम येथे येत आहेत. काही गाण्यांचे रेकॉर्डिंगही होत आहे. त्यातच आता "कलर्स' आणि "सहारा' या वाहिन्यांवर "सूरक्षेत्र' हा कार्यक्रम येणार असल्याचे आणि त्यात पाकिस्तानी गायक असल्याचे समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने याला कडाडून विरोध केला होता. "कलर्स' व "सहारा' या दोन्ही वाहिन्यांना मनसेने धमकीचे पत्र दिले होते. या पत्रात अशा प्रकारचा शो आम्ही होऊ देणार नाही. तरीही तो प्रसारित झाल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असे म्हटले होते.

राज ठाकरे यांनी या शोचे चित्रीकरण दुबईत झाले असले तरी त्यांची कार्यालये येथे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सज्जड दम भरला होता. त्यामुळे "कलर्स' व "सहारा' या वाहिन्यांच्या कार्यालयांबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. मात्र आज सकाळी "सहारा'चे संचालक बोनी कपूर, "कलर्स'चे सीईओ राज नायक हे राज यांना भेटायला "कृष्णकुंज'वर गेले. त्यांच्यात या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर राज यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली.

यापुढे पाकिस्तानी कलाकारांना संधी नाही
भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन आम्ही कोणताही कार्यक्रम करणार नाही, असे आश्‍वासन बोनी कपूर व राज नायक यांनी दिल्यानंतर प्रसारणाची परवानगी दिली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, की पाकिस्तानी कलाकारांना यापुढे घेणार नाही, असे आश्‍वासन बोनी कपूर व राज नायक यांनी आम्हाला दिले. त्यामुळेच ही परवानगी दिली. तशी खबरदारी बोनी हे घेतील, असे त्यांनी आम्हाला कळविले आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल, असे म्हणणे बोनी कपूर यांनी राज यांच्यासमोर मांडले.

शिवसेनेची फेसबुकगिरी
शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध आहे आणि तो कायम राहील, असे भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, की आम्ही अजिबात शेपूट घालणार नाही. देशबांधवांच्या भावनांची आम्ही आदर करतो. पाकिस्तानी कलाकारांना येथे पाय ठेवू देणार नाही. हा सगळा खेळ टीआरपीसाठी चाललेला आहे. त्यामुळे आम्ही आर्कुट व फेसबुकवर कम्युनिटी तयार करणार आहोत. सगळ्यांना हा कार्यक्रम पाहू नका आणि टीआरपी वाढवू नका, असे आवाहन करणार आहोत.

सचिनबाबतची भूमिकाही स्पष्ट करावी- आशा भोसले
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना "अतिथी देवो भव की पैसे देव भव!' असे सुनावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "कलर्स' व "सहारा' या वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका भेटीतच "मिले सूर मेरा तुम्हारा' असे सूर जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. राज यांच्या आरोपाला आशाताई यांनी "लोगों का काम है कहना' असा टोला लगावला. आशाताईंवर आरोप करणाऱ्या राज यांनी लगेच आपली भूमिका का बदलावी, असा प्रश्‍न विचारला जात आहे. राज यांच्या टीकेला आशाताईंनी आजवर उत्तर दिले नव्हते.

गुरुवारी त्यांना विचारले असता एका वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, ""कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना...'' या गाण्याच्या ओळी सुरेल आवाजात गाऊन प्रत्युत्तर दिले. त्या पुढे म्हणाल्या, ""आपण पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करू नये, असा सल्ला देणाऱ्या राज यांनी सचिन तेंडुलकर पाकिस्तानी खेळाडूंसोबत खेळल्यास मनसेची भूमिका काय असेल, तेही स्पष्ट करावे.'' पाकिस्तानी कलाकारांना घेतल्याबद्दल वाहिन्यांना धमकाविणाऱ्या राज ठाकरे यांनी वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरात सूर मिसळावा याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. या भेटीत चर्चा झाली की "अर्थ'पूर्ण सेटलमेंट झाली, अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे







'सूरक्षेत्र' कार्यक्रमाला राज ठाकरेंची परवानगी

'सूरक्षेत्र' कार्यक्रमाला राज ठाकरेंची परवानगी
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 06, 2012 AT 12:59 PM (IST)

मुंबई - पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या कलर्स वाहिनीवरील 'सूरक्षेत्र' या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) परवानगी दिली.

पाक कलाकरांचा समावेश असल्याने राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. त्यामुळे आज सकाळी कार्यक्रमाचे दिग्दर्शक बोनी कपूर आणि कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हा कार्यक्रम प्रसारित करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. मात्र, येथून पुढे असे कार्यक्रम झाल्यास त्याला मनसेचा विरोध असेल. यापुढे पाक कलाकारांच्या सहभागावर आमचा कायम आक्षेप असणार आहे, असे ते म्हणाले.

सुरक्षेत्र हा कार्यक्रम कलर्स आणि सहारा वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. यापुढे पाक कलाकारांना घेऊन असे कार्यक्रम करणार नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावरही टीका केली होती






रविवार, 2 सितंबर 2012

पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट - राज ठाकरे

पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Monday, September 03, 2012 AT 03:00 AM (IST)


मुंबई- "पाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपटी आहे. कितीही वेळा नळीत घातली तरी ती सरळ होणार नाही,' असा हल्लाबोल करत "पाकिस्तान विरोधी भूमिका म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही,' असा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) केला.

राज म्हणाले, "भारतातील दहशतवादी कारवाया रोखण्यास पाकिस्तान पुढाकार घेत नाही. मात्र, त्यांच्या कलाकारांना पैसे कमविण्याची एकमेव जागा भारत आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना रोखत नाही, तोपर्यंत पाकिस्तानवर दबाव येणार नाही; पण पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचे शेपूट आहे. ते सरळ होणार नाही.''

"पाकिस्तानविरोधी भूमिका म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही. हा भारत विरुद्ध पाकिस्तान आणि बांगलादेश संदर्भातील वाद आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत तीन "सुपरस्टार' खान आहेत. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन भारतीय या तिघांवर प्रेम करतात. शिवाय, कोणत्याही जाती-धर्माच्या घरगुती, सार्वजनिक कार्यक्रमात बिस्मिल्ला खान यांच्या सनईचे सूर ऐकू येतात. त्यामुळे, माझी भूमिका मुस्लिमविरोधी आहे, असा गैरअर्थ काढून राजकारण करू नये,' असा टोला राज यांनी लगावला.

बिहारी नेते आणि माध्यमांना राज यांचा इशारा
"राज ठाकरेंवर देशद्रोही खटला भरा,' अशी मागणी करणाऱ्या बिहारी नेते आणि हिंदी माध्यमांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. "महाराष्ट्रात गुन्हे करणारे बिहारमध्येच कसा पळ काढतात. "अमर जवान स्मारका'ची मोडतोड करणाऱ्या युवकाला बिहारमध्येच कसा आश्रय मिळतो,' असा सवाल राज यांनी केला. ते म्हणाले, ""आम्ही बोललो की त्यावर हिंदी चॅनेल्स आणि बिहारी नेते राष्ट्रीयत्त्वाच्या गप्पा मारत आमच्यावर टीकेची झोड उठवतात. "राज ठाकरे देशद्रोही आहेत', अशी गरळ ओकत देशाचे राजकारण तापवतात. स्वत:च्या वाहिनीचा "टीआरपी' वाढावा, म्हणून त्यावर चर्चा घडवून आणतात.'' यापुढे अशा प्रकारची टीका थांबवा. मी मराठीत काय बोलतो ते समजून घ्या. त्यामागची भूमिका जाणून घ्या, माझा पारा चढवू नका. नाहीतर महाराष्ट्रातल्या सर्व हिंदी चॅनेलवाल्यांचा खेळ थांबेल.''

राज म्हणाले...
- राज्याचे पोलिस आयुक्‍त बिहारचे पत्र आल्याचे सांगत असताना गृहमंत्री आर. आर. पाटील मात्र पत्र आले नाही, असे जाहीर करतात. गृहविभागात काय सुरू आहे, हे आबांना कळतच नाही. त्यांना कोणी सांगतही नाही.
- आमच्या कुटुंबांचे मूळ बिहारमध्ये असेल तर दिग्विजयसिंह यांचा जन्म काय सुलभ शौचालयात झाला काय? वाट्‌टेल तसे बोलणारे दिग्विजय म्हणजे कॉंग्रेसने शिव्या खाण्यासाठी पाळलेलं कार्टं आहे.
- "रोखठोक बोलणे ही आशाताईंची ओळख आहे. त्यांना राजकारण कळत नसेल; पण देशात काय सुरू आहे, हे त्यांना कळत नाही काय?



राज्यातील आरोपी बिहारमध्येच का जातात?- राज

राज्यातील आरोपी बिहारमध्येच का जातात?- राज
- वृत्तसंस्था
Sunday, September 02, 2012 AT 01:41 PM (IST)

मुंबई - महाराष्ट्रात कोणताही गुन्हा घडल्यास पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्येच का जावे लागते? राज्यात घडणारे सर्वाधिक गुन्हे परप्रांतियांकडूनच घडत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) केले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, ''अमर जवान स्मारकाची मोडतोड करणारा आरोपी बिहारलाच का गेला? महाराष्ट्रातील सर्व गुन्हे कोणी केले आहेत आणि ते कोठे जातात हे तपासा. या राज्यातील लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येत आहेत. येथून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही नोंद नाही. केरळ पोलिस परप्रांतियांची नोंदणी करून घेते, मग महाराष्ट्रातील पोलिस का करत नाही. पोलिस खात्यात काय सुरु आहे, याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नसते. त्यांना हे खाते समजत नाही आणि ते त्यांना कळतही नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आशाताईंच्या विषयात मी काय चुकीचे बोललो, असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, की बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या कलाकारांना आपण का प्रोत्साहन देत आहोत? आपल्या देशात येऊन ते पैसे कमावितात. इतर वेळी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आशाताईंनी या मुद्द्यावर का रोखठोक भूमिका मांडली नाही. इकडे माणसे मारली जात आहेत आणि आपण मैत्रीचा हात पुढे करत आहोत. मी जातीचा मुद्दा उपस्थित करत नसून, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हा माझा मुद्दा आहे.

दिग्विजय सिंह यांच्या विषयी सडेतोड वक्तव्य करताना राज म्हणाले, ''काँग्रेस पक्षाने शिव्या खाण्यासाठी ठेवलेले व्यक्ती आहेत. तसेच ते काँग्रेसचे बुजगावणे देखील आहे. ठाकरे कुटुंबिय मुळचे बिहारचे आहे, असे म्हणणारे दिग्विजय यांचे कुटुंब सुलभ शौचालयातील आहे का? बिहारमधून आम्ही मध्य प्रदेशातील धार गावी आलो, असे म्हणणारे दिग्विजय यांची सवय धाड टाकण्याची आहे.

गुरुवारी बिहारी नागरिकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातील हिंदी चॅनेल्सचे पत्रकार आणि नेते कसे एकत्र येतात, हे यामुळे स्पष्ट झाल्याचे राज यांनी सांगितले. याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील नेते एकत्र का येत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज म्हणाले, की माझे म्हणणे समजून न घेता सर्व वृत्तवाहिन्यांवर चर्चा सुरु झाली. हिंदी चॅनेल्सवाल्यांनी आपला खेळ थांबवावा, नाहीतर मी तुमचा खेळ थांबवील. तुम्हाला मराठी समजत नसेल तर महाराष्ट्रातील पत्रकारांकडून समजावून घ्या. पण, चुकीचा अर्थ काढून चर्चा करू नका