शुक्रवार, 15 जून 2012

टोलनाक्‍यांवरील वाहनांचा लेखाजोखा मनसे मांडणार

टोलनाक्‍यांवरील वाहनांचा लेखाजोखा मनसे मांडणार
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, June 16, 2012 AT 01:00 AM (IST)
मुंबई - रस्त्यांच्या खर्चाच्या नावाखाली आघाडी सरकार उद्याच्या काळात गल्लीतही टोलनाके उभारतील, असा आरोप करून राज्यातील टोलनाक्‍यांवर दिवसाला किती टोलवसुली होते, याचा लेखाजोखा मनसे ठेवणार असल्याची माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. त्याच वेळी या कार्यकर्त्यांच्या कामात संबंधित कंपनी अथवा सरकारने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मी हंगामा करीन. हा हंगामा मग कोणालाही आवरता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

कृष्णकुंजवर आयोजित पत्रकार परिषदेत टोलनाक्‍यांच्या विरोधातील लढा हा टोलवसुलीत पारदर्शकता येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. ठाण्यात टोलनाक्‍यांच्या विरोधात केलेल्या आवाहनानंतर राज्यात जागोजागी मनसैनिकांनी आंदोलन केले. मी टोलवसुलीच्या विरोधात नाही. कामे करण्यासाठी निधी लागतो, याची कल्पना मला आहे. पण, टोलनाक्‍यांच्या नावाखाली कमी वाहने दाखवून मंत्री आणि कंत्राटदार एकत्र येऊन जी नागरिकांची लूट करीत आहेत; त्याला आपला विरोध असल्याचे ते म्हणाले. ही गुन्हेगारी स्वरूपाची लूट उघडकीस आणण्यासाठी सोमवारपासून राज्यातील प्रत्येक टोलनाक्‍यावर 50 मनसैनिक उभे राहून वाहनांची संख्या मोजणार आहेत. तसेच, या वेळी फलक लावून वाहनचालकांना टोलच्या बदल्यात त्यांना किमान कोणत्या सुविधा देणे अपेक्षित आहे, याची माहिती दिली जाणार आहे. मनसेचे कार्यकर्ते कामात कोणताही अडथळा आणणार नाहीत. मात्र, या कार्यकर्त्यांना काही त्रास दिल्यास संपूर्ण राज्यात हंगामा करण्याचा इशारा राज यांनी दिला.

मंत्र्यांच्या आशीर्वादाने टोलवसुलीत पारदर्शकता राहिलेली नाही. कंत्राट भरताना गाड्यांचा आकडा कमी दाखविणे, कमी वाहनांच्या नावाखाली कंत्राट वाढवून देणे, कंत्राट संपल्यावरही वसुली सुरू ठेवणे, कायद्याने सुरक्षितता देणे आवश्‍यक असताना वाहनचालकांना वाऱ्यावर सोडणे, परतीचा प्रवास असल्यास प्रवासाचा टोल पन्नास टक्के घेणे बंधनकारक असताना पूर्ण पैसे घेणे आदी गोष्टी या टोलनाक्‍यांच्या कंत्राटामध्ये सर्रास सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

छगन भुजबळांची रोजीरोटी
मी टोलनाक्‍याच्या विरोधात बोलल्यावर छगन भुजबळ यांच्या रोजीरोटीवरच लाथ मारल्यासारखे ते चिडले आहेत. पण, मला समजाविण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. व्यवसाय कसा करायचा, याची मला माहिती आहे. तसेच, टोलनाका नाही, तर राज्य चालविण्यास आपण तयार असल्याचा टोला राज यांनी छगन भुजबळ यांना लगावला.

महाराष्ट्रात वाहनचालकांना फेफरे
गुजरातमध्ये डाव्या बाजूने चालणाऱ्या इतर राज्यांतील ट्रकचालकांना महाराष्ट्रात आल्यावर फेफरे भरते. येथील कायद्याचा धाक नसल्यानेच हे ट्रकचालक आडवेतिडवे गाड्या चालवत असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यासाठी "एनएच-4' या महामार्गाची आपण डीव्हीडी तयार केली आहे. या डीव्हीडीमध्ये कर्नाटकमधील महामार्गावरील वाहतूक आणि महाराष्ट्रातील वाहतुकीतील फरक कळत असल्याचे सांगून या डीव्हीडीचे वाटप त्यांनी केले

बुधवार, 13 जून 2012

औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला

औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 13, 2012 AT 02:22 PM (IST)

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 13) दुपारी दोन वाजता हर्सुल सावंगी येथील टोल नाक्‍याची तोडफोड केली.

या आंदोलनात नगरसेवक राजगौरव वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या टोल नाक्‍यावर रस्ता तयार करण्यासाठी किती निधी दिला? त्यातून टोल किती वसुल झाला? याच्या माहितीचा फलक न लावल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले

मंगलवार, 12 जून 2012

मनसेतील नासके आंबे पत्र पाठवून कळवा!

मनसेतील नासके आंबे पत्र पाठवून कळवा!
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 13, 2012 AT 03:00 AM (IST)
ठाणे -  नाशिकमध्ये मनसेचा महापौर झाला, पुण्यात विरोधी पक्षनेता आपला आहे; मग ठाण्यातच कोठे घोडे अडले? असा सणसणीत सवाल करत संघटनेतील नासके आंबे बाहेर काढावेच लागतील... मग ते कितीही मोठ्या पदावरचे असोत, असे सूतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 12) ठाण्यात केले. मी एका मर्यादेपर्यंत सहन करतो, असे स्पष्टपणे बजावून त्यांनी ठाण्यातील पक्षसंघटनेतील फेरबदलांना सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले.

निवडणुकीच्या काळात कोणी कोणी काय काय केले ते आपल्याला "राजगडा'वर पत्रे पाठवून कळवा, असे आवाहनही त्यांनी गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना केले. मेळाव्यात राज यांनी संघटनेतील फुटीर मंडळींची चांगलीच झाडाझडती घेतली.

ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेला मिळालेले अपयश अनपेक्षित होते, असे सुरुवातीलाच सांगत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना फैलावर घेण्यास सुरुवात केली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मनसेला पडलेली मते आणि महापालिका निवडणुकीत पडलेली मते यातील फरक लक्षात घ्या, असे परखडपणे सुनावतानाच "तुमचा जनसंपर्क का कमी पडला याचा एकदा शांतपणे विचार करा', असेही त्यांनी सुचविले. प्रश्‍नांना वाचा फोडल्याशिवाय लोकसंग्रह होत नाही, असे सांगून त्यांनी ठाण्यातील असंख्य प्रश्‍न हातात घ्या, असे आवाहनही उपस्थितांना केले. तुमच्यात जर जनतेचे प्रश्‍न सोडवण्याची संवेदनाच नसेल तर तुम्ही पुढे जाणार कसे? निवडणुका आल्या की उमेदवारी मात्र हवी. इतर वेळी गळ्यात गळे घालून फिरणार आणि निवडणुकीला तिकीट मिळाले नाही की एकमेकांना पाण्यात पाहण्यास सुरुवात करणार, असे सांगून त्यांनी ठाण्यात तुम्ही अशी काय क्रांती केलीत? असा प्रश्‍नही विचारला. एकीकडे मी पक्ष उभा करायचा, जनतेचा विश्‍वास संपादन करायचा आणि तुम्ही मात्र तो घालवायचा हे चालणार नाही, असेही त्यांनी सडेतोडपणे बजावले.

टोलनाके-क्वॉरीमालकांविरोधात आंदोलन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावरही राज ठाकरे यांनी जोरदार आसूड ओढले. ""सध्या राज्यात काय चालू आहे तेच कळत नाही. राज्यकर्ते लुटत आहेत आणि विरोधी पक्षांना त्यांनी खिशात घातले असल्याने तेही काही करीत नाहीत. पण आपल्या पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा,'' असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पिशव्यामुक्त करण्यापेक्षा टोलमुक्त करा, असे सांगून राज्यभर मनसे टोलमुक्तीसाठी आंदोलने करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे सर्वत्र डोंगर पोखरणाऱ्या क्वॉरीमालकांविरोधात आंदोलनाने दणका देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या नावाखाली तिकडे स्वतःचा वेगळा टोल लावू नका, असा चिमटाही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना लगावला.

"राजगडा'वर थेट पत्रे पाठवा
महापालिका निवडणुकीत काय चुकले आणि काय करायला हवे होते, याचे सविस्तर पत्र आपल्याला थेट "राजगडा'वर पाठवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले आहे. आलेली पत्रे आपण स्वतः वाचणार असून ती हर्षल देशपांडे आणि केदार अंबाळकर यांच्याकडे लिफाफ्यातून द्या, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. महापालिका निवडणुकीत कोणी संघटनेचे काम केले नाही आणि कोणी प्रामाणिकपणे केले असेल तर तेही सांगण्याचा मोठेपणा तुमच्याकडे असला पाहिजे, असेही त्यांनी बजावले.

वाढदिवसाची होर्डिंग्ज बंद करा
राज ठाकरे यांनी मेळाव्यात वाढदिवसाची होर्डिंग्ज दिसली नाही पाहिजेत, असा इशारा आपल्या कार्यकर्त्यांना दिला. माझ्याही आणि तुमच्याही वाढदिवसाची होर्डिंग्ज बंद करा, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले