शुक्रवार, 24 फ़रवरी 2012

पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे?

पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे?
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 25, 2012 AT 02:15 AM (IST)

पुणे - शहराच्या विविध प्रश्‍नांबाबत असलेली परस्परविरोधी मते, रिपब्लिकन पक्षाला स्वत:कडे ओढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आणि पदांबाबतच्या अपेक्षा यामुळे पुणे महापालिकेत भाजप-शिवसेना आणि रिपब्लिकन युतीची एक गट म्हणून विभागीय आयुक्‍तांकडे नोंदणी दुरापास्त झाली आहे. त्यामुळे मनसेचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वाधिक संख्याबळ असलेला विरोधी पक्ष किंवा नोंदणीकृत आघाडीस विरोधी पक्षनेतेपद देण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांनी एकत्रित येऊन विभागीय आयुक्तांकडे एक गट म्हणून नोंदणी केली, तर त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, महायुतीच्या एकत्रित नोंदणीची शक्‍यता दोन्ही प्रमुख पक्षांनी जवळपास नाकारली आहे. त्यामुळे 29 जागा असणारा मनसे पुणे महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून विराजमान होणार असल्याची शक्‍यता बळावली आहे.

या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी म्हणाले, ""पुणेकरांनी शहरात कोणालाही स्पष्ट कौल दिला नसला, तरी राष्ट्रवादीला सत्तेसाठी जनादेश मिळाला आहे, तर विरोधी पक्षात मनसेला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजप-शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाची एकत्रित नोंदणी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महायुती महापालिकेच्या जागावाटपापुरती सीमित होती, तिघांना एक गट म्हणून एकत्र येणे कितपत शक्‍य आहे, याचा विचार करावा लागेल.''

शिवसेनेच्या संपर्क प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ""एकत्र गट नोंदणीबाबत आमची चर्चा झालेली नाही. भाजपकडून तसा प्रस्ताव यायला हवा, तसा प्रस्ताव आला, तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.''

स्वतंत्र अस्तित्वावरच भर
बीडीपीसह अनेक मुद्द्यांवर भाजप आणि शिवसेनेत मतभेद असून, एक गट म्हणून नोंदणी झाली तरी भविष्यात अनेक विषयांवर मतभेद होऊ शकतात. त्यामुळे एकमेकांमध्ये गट म्हणून अडकण्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यावरच या दोन्ही पक्षांचा भर असल्याचे समजते



गुरुवार, 23 फ़रवरी 2012

मोदींच्या सुरक्षाकवचाखाली नाशिकचे मनसैनिक

मोदींच्या सुरक्षाकवचाखाली नाशिकचे मनसैनिक
-
Friday, February 24, 2012 AT 03:30 AM (IST)

नाशिक - महापालिकेची सत्ता काबीज करताना स्वतःच्या "संख्याबळा'ची खबरदारी घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 40 नगरसेवक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रवाना झाले. नगरसेवकांना कुठल्या भागाची सफर घडविणार, हे "राज' गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले, तरी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाकवचाखाली जाण्यासाठी नगरसेवकांची बस जव्हार, मोखाडामार्गे गुजरातला रवाना झाल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीत 40 जागा मिळवून मनसे मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. नाशिकचा महापौर मनसेचाच असे जाहीर केल्यानंतर त्यादृष्टीने फिल्डिंग लागण्यास सुरवात झाली. इतर पक्षांचे पाठबळ मिळविताना आपल्याच पक्षाकडून काही दगाफटका नको म्हणून मनसेच्या नेत्यांनी 40 नगरसेवकांना सफर घडविण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी दहापासून आमदार वसंतराव गिते यांच्या भाभानगर येथील निवासस्थानावर मुक्कामाचे सामान घेऊन नगरसेवक आणि त्यांचे कुटुंबीय दाखल होऊ लागले. दुपारी साडेचारला आमदार नितीन भोसले वगळता आमदार गिते, आमदार ऍड. उत्तमराव ढिकले, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत नीता ट्रॅव्हल्सच्या दोन लक्‍झरी बसमधून नगरसेवक रवाना झाले. शहराबाहेर जाण्यापूर्वी सर्व नगरसेवकांना विभागीय महसूल आयुक्तांसमोर हजर करून पक्षाची नोंदणी करण्यात आली. हॉटेल पुरोहितमध्ये जेवणाचा आस्वाद लुटल्यानंतर लक्‍झरी बस त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना झाल्या. नगरसेवकांच्या पर्यटनाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. "राज को राज रहने दो' म्हणत नगरसेवकांनीही तोंडावर बोट ठेवले

मंगलवार, 21 फ़रवरी 2012

विधानसभेनंतर मते घटल्यावरही मुंबईत मनसेचे इंजिन सुसाट

विधानसभेनंतर मते घटल्यावरही मुंबईत मनसेचे इंजिन सुसाट
राजेश मोरे - सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, February 21, 2012 AT 04:00 AM (IST)
 

मुंबई - भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाने एकत्र येऊन "महायुती" म्हणून लढविलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकीतील मते अल्प प्रमाणात वाढली आहेत. विधानसभेच्या मानाने या मतांमध्ये अल्प प्रमाणात का होईना वाढ झाल्यावरही जागा कमी होण्याचा फटका युतीला बसला आहे. पण त्याचवेळी सातत्याने एकट्याने लढत असलेल्या मनसेच्या मतांमध्ये विधानसभेच्या मानाने लाख मतांची घट झाल्यावरही जागा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या निवडणूकीपासून मनसेचे इंजिन जोरात मुंबईसह महाराष्ट्रातील प्रवास करीत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एकएक शहर करीत संपूर्ण राज्यात मनसे मजबुत करणार असल्याचे सांगितले आहे. खेड नगरपालिकापाठोपाठ नाशिकवर मनसेचा झेंडा फडकून त्याची सत्यता प्रत्यक्षात येणार असल्याचे मानले जात आहे. मनसे वाढताना शिवसेनेच्या नेतृत्त्वाने कितीही अमान्य केले तरी त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मुंबईसह इतर शहरीभागातील शिवसेनेतील अंतर्गत शहकाटशहाचे राजकारण मनसेच्या पथ्यावर पडत आहे. 2009 मधील विधानसभेच्या निवडणूकीत मनसेचे मुंबईतून तब्बल सहा आमदार निवडून आले होते. या विधानसभेच्या निवडणूकीत मनसेला 10 लाख 83 हजार 138 मते मिळाली होती. तर त्यावेळी रिपब्लिकन पक्ष सोबत नसताना शिवसेना भाजप युतीला 14 लाख 29 हजार 447 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे केवळ चार आमदार आणि भाजपचे पाच आमदार निवडून आले होते.

यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यासाठी त्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून महायुतीच्या प्रचाराची सारी सुत्रे आपल्या हाती ठेवून महायुतीला सत्तेच्या नजीक नेऊन ठेवले आहे. पण महापालिकेच्या निवडणूकीत रिपब्लिकन (आठवले) गटाला सोबत घेतल्यावरही या निवडणूकीत महायुतीला 14 लाख 35 हजार 733 मते मिळाली आहेत. विधानसभेच्या निवडणूकीपेक्षा सहा हजार 286 मतांची वाढ मिळाल्यावरही आणि युतीची "महायुती" झाल्यावरही महायुतीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. तर मनसेची मते विधानसभेच्या मानाने तब्बल 1 लाख 33 हजार 5 मतांनी घटल्यावरही त्यांनी तब्बल 29 जागांपर्यंत मजल मारली आहे. मनसेला महापालिकेच्या निवडणूकीत मुंबईत 9 लाख 50 हजार 133 मते मिळाली आहेत. विधानसभेपेक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत कमी झालेली मते मनसेच्या दृष्टीने एक चर्चेचा विषय असला तरी ठराविक मराठमोळ्या पॉकेट्‌समधील मनसेच्या मतांची वाढ रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्यावरही युतीच्या आणि त्यातही शिवसेनेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे



'मनसे'च्या पर्यायावर मतदारांची मोहोर

'मनसे'च्या पर्यायावर मतदारांची मोहोर
विष्णू सोनवणे - सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 21, 2012 AT 03:45 AM (IST)


मुंबई - मुंबई महापालिकेत महायुतीला बहुमत मिळाले असले, तरी खणखणीत पर्याय म्हणून लोकांनी मनसेला स्वीकारले आहे. मुख्य राजकीय पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांनी या वेळी 28 जागांवर मनसेच्या बाजूने कौल दिला. 2007 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीच्या तुलनेत अडीच लाख इतके मताधिक्‍य मनसेला मिळाले आहे. सर्वच राजकीय पक्षांची नकाराची मते पर्याय म्हणून मनसेकडे वळली असल्याचे यावेळच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मनसेचा फटका या वेळी सर्वच राजकीय पक्षांना बसला आहे.

मनसेने 2007 मध्ये 221 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सात नगरसेवक निवडून आले होते. त्या निवडणुकीत मनसेने चार लाख 38 हजार मते मिळविली होती. मनसेचा सर्वाधिक फटका त्या वेळी शिवसेनाला बसला होता; मात्र या वेळी मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तब्बल सहा लाख 40 हजार मते मिळवून मनसेने 28 जागा जिंकल्या आहेत. 52 जागांवर मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला. सर्वच राजकीय पक्षांना मनसेने ब्रेक लावला. राज ठाकरे यांचा तरुणांवर असलेला प्रभाव या वेळीही कायम राहिला असला, तरी तरुणांचे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. राज यांच्या भाषणाच्या प्रभावाने तरुण, दलित, मुस्लिम, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी मनसेच्या पारड्यात भरभरून मते टाकली. या मतदारांच्या मोठ्या रांगा मतदान केंद्रांवर होत्या. या मतदारांनी मनसे हा पर्याय निवडल्याचे दिसून आले. शिवसेनेसह, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाची मतेही या वेळी मनसेला मिळाली. दलित आणि मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या अनेक मतदारसंघात मनसेने उमेदवार दिले होते. तेथेही मनसेला चांगली मते मिळाली.

नगरसेवकपदाची तिसरी-चौथी टर्म पूर्ण करणाऱ्या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांच्या संस्थानांना मतदारकंटाळले होते. मराठीचा मुद्दा, त्यानंतर सतत बदलत गेलेल्या राज ठाकरे यांच्या भूमिका यामुळे मनसेच्या मतांवर परिणाम झाला नाही; किंबहुना विखुरलेल्या दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदारही मनसेकडे आकृष्ट झाला. तरुणांची 70 टक्के मते मनसेला पडली. दादर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, चांदिवली, अंधेरी, मागाठणे, दहिसर, गिरगाव या भागांतून मनसेचे बुलंद गड निर्माण झाले आहेत.

शिवसेनेची मते मनसेला महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आलेल्या 29 जागांपैकी फक्त एकच जागा त्या पक्षाला मिळाली. या निवडणुकीतील पराभव रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागला आहे. कॉंग्रेसला पालिकेच्या सत्तेपासून रोखण्याचे काम आरपीआयने केले, हे निकालाने दाखवून दिले आहे; मात्र शिवसेना आणि भाजपची मते आरपीआयला न मिळता ती मनसेला मिळाली, हे आरपीआयच्या पराभवाचे कारण ठरले आहे; मात्र ती मते आरपीआयकडे का वळली नाहीत, याबद्दल आता आत्मपरीक्षण करणे आठवलेंना भाग आहे. किंबहुना या निकालाने आठवलेंना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे

रविवार, 19 फ़रवरी 2012

मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्येच - राज

मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्येच - राज
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 19, 2012 AT 11:21 AM (IST)
  
नाशिक - नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यातील पहिला महापौर नाशिकमध्येच होणार असल्याचे, आज (रविवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रथमच राज ठाकरे आज नाशिकमध्ये आले होते. नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा पूर्वीपासूनच प्रभाव आहे आणि तो या निवडणुकीतही सिद्ध झाला आहे.

नाशिकमधील जनतेचे आभार मानत राज ठाकरे म्हणाले, ''सत्तेसाठी चुकीचा निर्णय घेऊन जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रचारासाठी आणखी वेळ मिळाला असता तर काही जागा वाढल्या असत्या. काही महापालिकांसाठी आघाडीचे नेते माझ्या संपर्कात असले तरी, मी कोणाच्या संपर्कात आहे हे आताच स्पष्ट करणार नाही. मी आज फक्त माझ्या नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. नाशिकमधील जनतेला हेवा वाटेल असे काम करून दाखवू.



Raj Thakre Press Conference Nashik