मंगलवार, 24 जनवरी 2012

आम्ही प्रश्‍नही विचारायचे नाहीत का? -राज ठाकरे

आम्ही प्रश्‍नही विचारायचे नाहीत का? -राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 24, 2012 AT 01:59 PM (IST)
  
मुंबई - राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर घणाघाती टीका करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) आम्ही प्रश्‍नही विचारायचे नाहीत का? असा सवाल केला. प्रश्‍न विचारल्याने आयोगाचा अवमान कसा होतो, असा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज ठाकरे म्हणाले,""निवडणूक आयोग आयोगासारखे वागल्यास आम्ही प्रश्‍न विचारणार नाही. मात्र त्यात फारकत आढळून आल्यास आम्हाला तोंड उघडावे लागेल. कुणाच्या मनात शंका निर्माण होतील, असे आयोगाचे वर्तन नको. आम्ही प्रश्‍न विचारल्यावर आयोगाचा अवमान होतो, असे कसे काय म्हणता येईल? जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर महापालिकेच्या निवडणुका घेणे सर्वथा चुकीचे आहे. मतदान यंत्रांची कमतरता असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे. मात्र सध्या केवळ पाच राज्यात निवडणुका सुरू आहेत. इतर राज्यातून यंत्रे आणता येतील. एकाच दिवशी सर्व निकाल जाहीर करण्याची आमची मागणी आहे.''

मुंबई बॉम्बस्फोटांसदर्भात राज ठाकरे म्हणाले,""13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचा संबंध उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांशी असल्याचे वक्तव्य मी केले होते. काल दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या दाव्यावरून ते खरे ठरले आहे. या बॉम्बस्फोटांचा कट बिहारमध्येच रचण्यात आला आहे. मी काही बोललो की लोकांना ते खोटे वाटते. परंतु, इतरांनी सांगितल्यावर विश्‍वास बसतो.''

निवडणुकीबाबत ठाकरे म्हणाले,""जास्तीत जास्त जागांवर मनसेच्या उमेदवारांना संधी दिली जाईल. काही ठिकाणी पर्याय नसल्यास युतीचा विचार केला जाईल. मात्र मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही.'