बुधवार, 16 सितंबर 2009

मराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे

मराठी उमेदवाराचा आग्रह धरा - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 16th, 2009 AT 1:09 AM
..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई - मुंबई, ठाण्यात उत्तर भारतीयांना उमेदवारी द्या, अशी मागणी संजय निरुपम यांच्यासारखे नेते करीत आहेत; पण त्यांच्यासारखी भाषा कोणत्याही पक्षातील राजकारण्यांनी केली, तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा सणसणीत इशारा देतानाच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सर्व पक्षांनी महाराष्ट्रातील मतदारसंघांत मराठी उमेदवारांचा आग्रह धरावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले.
मनसेच्या शिवडी-भायखळा विभागातर्फे राजनिष्ठ प्रतिनिधींची घोषणा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा परळ येथील दामोदर हॉलमध्ये आयोजित केला होता. या वेळी महागायिका वैशाली माडे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.
या वेळी राज ठाकरे यांनी निरुपम यांच्यावर टीकेची झोड उठविली. विधानसभा निवडणूक जवळ येताच त्यांना आता कंठ फुटू लागले आहेत. उत्तर प्रदेश, बिहारींची संख्या महाराष्ट्रात वाढली असल्यामुळे 40 उत्तर भारतीयांना उमेदवारी द्या, अशी मागणी ते करीत आहेत. निरुपम यांच्यासारख्यांना कोणी वाढविलं, असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी शिवसेनेचे नाव घेता केला. अशा प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाणी दाखवा आणि त्यांचे अस्तित्व नष्ट करा, असेही राज म्हणाले.
शिवसेनेवर टीका
आमचा हा; तर तुमचा हा... तुमचा तो; तर आमचा हा... अशी स्पर्धा राजकीय पक्षांत सुरू आहे, अशी अप्रत्यक्ष टीका शिवसेनेवर करताना राज म्हणाले, की आम्ही कोणावरही जाळे टाकलेले नाही, तर वैशाली माडे मनापासून मनसेमध्ये आली आहे. काही राजकीय पक्षांत कोणी सुनेला; तर कोणी मुलाला तिकीट देण्याचे उद्योग सुरू आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात राहून काम केले, त्यांना संधी कधी मिळणार? माझा मुलगा समोर बसला आहे. मी त्याला व्यासपीठावर बोलावले असते. त्याच्या हस्ते बुके देऊन यांचा सत्कारही केला असता, असा टोला त्यांनी शिवसेनेला मारला. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांना व्यासपीठावर बसवून, त्यांच्या हस्ते आदेश बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला होता याकडे राज यांचा रोख होता.
'क्‍लास'ची चर्चा कशाला...
कोणी कुठे बसून प्रवास करतो याची चर्चा कशाला करता, तुम्ही इकॉनॉमी क्‍लासमधून प्रवास करा, नाही तर बैलगाडीतून प्रवास करा. लोकांना त्याचे काहीही देणे-घेणे नाही, हा काही जणांचा लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रकार आहे, अशी टीका करतानाच तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवते यांच्या स्वावलंबनाची खिल्लीही त्यांनी उडविली